नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

37) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

उत्तरायण...(लेख क्र . ३७)

उत्तरायण

प्रश्न व उत्तरे यातील जैवसंबंधाची आपण चर्चा केली. हा संबंध जितक्या अलगदपणे उलगडेल तितकी यशाची शक्यता वाढते. उत्तरांच्या मांडणीतील या काही टिप्स.

डाव आणि पेच

परीक्षेतील प्रश्न एकेकाळी सरळ व साधे असत. तो काळ गेला. आता प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ओळीच्यामध्ये वाचून डोकवावे लागते. (Reading between the lines) शब्दांपलीकडचा अर्थ ध्यानात घ्यावा लागतो. मुळात प्रश्न काय आहे, हे कधीकधी लगेच समजत नाही. एखादे विधान दिले जाते. ते कोणी केले, कोणत्या संदर्भात केले हेही सांगितले जात नाही. त्यामुळे त्या विधानाचा संदर्भ ओळखणे ही सर्वात निर्णायक बाब ठरते. त्या खालोखाल जर जमले तर ते विधान कोणी केले हे ओळखता येणे. पण पूर्ण खात्री असेल तरच विधान कोणाचे आहे, ते उत्तरात लिहावे, एरवी त्याची खास गरज नाही. पण विधानाचा अचूक संदर्भ ओळखणे महत्त्वाचे आहे. निव्वळ संदर्भ न लागल्याने प्रश्न सोडून देणारे उमेदवार आहेत. त्याहून वाईट म्हणजे संदर्भ चुकीचा लागला, तर लेखणी झिजवून, वेळ देऊन आपण उत्तर लिहितो, ते सगळेच वाया जाते. कधीकधी प्रश्नातील एखाद्या शब्दातून आपल्याला हिंट मिळते. त्यासाठी नेहमीच इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांत प्रश्न बघायचा. कधीकधी त्यातून संदर्भाचा उलगडा होतो.

आंधळी कोशिंबीर

असे फिरवून प्रश्न विचारण्यात एक फायदा आहे, की त्यामुळे परीक्षार्थी सखोल अभ्यास करून आले आहेत की, वरवरचा अभ्यास केला आहे, हे समजते. ज्यांचा अभ्यास तकलादू आहे, त्यांना प्रश्नांचाच थांग लागत नाही. ते उत्तरात आंधळी कोशिंबीर खेळतात. पण ते सहज पकडले जातात. कारण लेखी उत्तरांमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या ओळीमध्येच उमेदवाराची चलाखी पकडता येते. लेखी परीक्षेत फसवाफसवी करता येत नाही. त्यामुळे पूर्वपरीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेचा अदमास जास्त चांगल्याप्रकारे बांधता येतो व प्रयत्नांना थेट फळ मिळते.

संयमाची आवश्यकता

काहींना आपले गुण दाखवायची (उधळायची) सवय असते. प्रश्न कोणताही असो, त्यांना हवे ते त्या प्रकारे उत्तर लिहितात. हे उमेदवार 'अपने मन के बादशहा' असतात. त्यांची तक्रार असते, की त्यांचे सगळे ज्ञान परीक्षेत तपासलेच जात नाही. आता तत्त्वतः हे खरेच आहे. परीक्षेतील प्रश्नातून अभ्यासातील फार तर पाच टक्केच ज्ञान तपासले जाते. परीक्षा हा एक प्रकारचा सॅम्पल सर्व्हेच असतो. पण म्हणून हवे तसे लिहून चालणार नाही. शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने परीक्षक उमेदवाराची तयारी जोखतो. परीक्षकाच्या क्षमतांवर शंका घेण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. परीक्षा निकोप आहे व त्यातून आपल्याला आपल्या मेहनत व कुवतीनुसार न्याय मिळेल, अशी श्रद्धा असल्याशिवाय स्पर्धापरीक्षा देऊ नये किंवा परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यामध्ये अशा प्रकारची श्रद्धा ढासळू लागली, तर सरळ स्पर्धापरीक्षांना रामराम ठोकावा. एकदा व्यवस्थेवर अविश्वास निर्माण झाला, तर प्रयत्न बोथट होतात, १००% योगदान देता येत नाही. मग उमेदवार व आयोग दोघांमधील संबंध कटू बनतात. ही कटुता टाळायची असेल, तर आयोगाच्या क्षमतेबद्दल नकारात्मक बोलणे, लिहिणे किंवा विचार करणे टाळावे. कारण या सगळ्याची परिणती अपयशाचे खापर परीक्षापद्धतीवर फोडण्यात होते. अपयश आले तरी ते स्वीकारता आले पाहिजे. कोणावर खापर फोडून उपयोग नाही.

एकाच लांबीची उत्तरे हवी

उत्तरांना जर न्याय दिला नाही, उत्तरांनाही प्रश्न पडू लागतात. उत्तरांना न्याय द्यायचा म्हणजे शक्यतो एकाच लांबीची उत्तरे हवी. खाडाखोड टाळावी. उत्तराची सरंचना तयार न करता थेट उत्तरे लिहायला गेले की ही समस्या होते. उत्तर थोडे अंतर डौलदारपणे जाऊन डेड एंड आल्यामुळे थांबते. मग रस्ता बदलून पुन्हा सुरुवात करावी लागते. यात वेळ तर जातोच, शिवाय परीक्षकावर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळेच संरचना तयार करूनच उत्तरे लिहावी व खाडाखोड करायची वेळ आलीच, तर व्हाइटनरचा वापर करावा. शेवटीशेवटी वेग वाढवावा लागतो. तेव्हाही अक्षर फार बिघडता कामा नये. सरावासाठी मुद्दामहून कमी वेळात काही उत्तरे लिहून बघावी. पेनाचे टोक व बोट यात योग्य अंतर ठेवावे (दीड सेंटीमीटर) लिहून लिहून हात दुखतो, तेव्हा दोन प्रश्नांच्या मधल्या काळात विचार करताना पंजा पसरवून बोटांना थोडी विश्रांती द्यावी.

चांगली उत्तरे लिहिता येणे ही एक प्रकारची आराधनाच आहे. ती जर जमली तर यशाच्या महामार्गावरून सुसाट निघालाच म्हणून समजा.
 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- प्रश्नांची दिशानिश्चिती

No comments:

Post a Comment