नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

35) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

परीक्षेतील उत्तरपद्धती...(लेख क्र . ३५)

परीक्षेतील उत्तरपद्धती

लेखनाचा सराव करताना जे मुद्दे समोर येतात, त्याची आपण गेल्या भागात चर्चा सुरू केली. आज आपण शब्द, गुण व वेळ याचे त्रैराशिक कसे सोडवता येईल याचा विचार करू.

उत्तरातील प्रस्तावना

विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये प्रत्येक उत्तरात प्रस्तावना अपेक्षित असते. पण स्पर्धा परीक्षांमध्ये मुळात जागा व वेळेची टंचाई असल्याने प्रस्तावना लिहिणे अपेक्षित नाही. फार मोठे प्रश्न असतील (३० गुणांचे) तर दोन-तीन ओळींत प्रस्तावना लिहिता येईल. तीही विषयाला पुरक असायला हवी. प्रस्तावनेतून विषयाच्या दिशेकडे कूच केली पाहिजे. थोडक्यात प्रस्तावनेमुळे उत्तराच्या प्रमाणबद्धतेला बाधा येता कामा नये.

शब्द व गुण यांचे द्वंद्व

परीक्षेत सध्या १०, १२, २० गुणांचे प्रश्न आहेत व वैकल्पिक २०/३० गुणांचे प्रश्न आहेत. पण याहून कमी वा जास्त गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. एकदा मुख्य परीक्षेत 'भारत-चीन संबंध' या मुद्द्याचा प्रश्न चक्क तीन गुणांसाठी आला. हा असा विषय आहे की त्यावर तीन पाने सहज लिहिता येतील. पण तीन गुण म्हणजे अगदीच चार ओळी. काही उमेदवारांना इतक्या कमी शब्दांत काय लिहायचे हेच कळेना व त्यांनी चक्क उत्तरच लिहिले नाही. तर अशा प्रकारची माघार अपेक्षित नाही. कोणत्या प्रश्नासाठी किती गुण ठरवायचे याचा अधिकार आयोगाला आहे. आपण आपले 'आलीया प्रश्नांशी असावे सादर.'

जे साधे ते सुंदर

उत्तरे लिहिताना मोठमोठी पल्लेदार वाक्ये, कठीण वाक्यरचना टाळली पाहिजे. सोपी छोटी वाक्ये लिहावी. One is writing to express and not to impress. तेव्हा जर तुमच्या लिखाणात नावीन्य असेल, ओज व प्रवाह असेल, शब्दांची निवड अचूक असेल, तर आपोआपच हे लिखाण सुंदर असेल. जे सोपे असते, ते सुंदरही असतेच. सोपे लिहिणे जमण्यासाठी विषयावर पकड लागते व ती शैली सरावाने तयार होत जाते.

अक्षरलेखन

अक्षर सुवाच्य व नीटनेटके असावे. अगदी मोत्यासारखे नसले तरी वाचताच येणार नाही, इतके वाईट नसावे. खूप छोटे अक्षर काढल्यास परीक्षकाला वाचायला त्रास होतो. तेव्हा अक्षर मध्यम आकाराचे असावे. परीक्षेत किती जागेत उत्तर लिहायचे, याची जागा ठरवून दिलेली असते. त्या जागेतच लिहायला हवे. संपूर्ण उत्तरपत्रिका आता प्रश्न व तपासणीच्या जागेसह छापलेली असते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कोठेही लिहिता येते. पुरवण्या जोडायची वेळ येत नाही. पुरवण्या नीट न जोडल्यामुळे हरवल्याची प्रकरणे मागे घडत असत. पण आता तशी संभावना नाही. पण तोटा म्हणजे सुरुवातीला चांगले अक्षर काढून परीक्षकाला प्रभावित करण्याची जुनी युक्ती आता चालत नाही. संपूर्ण पेपरात अक्षराचा दर्जा समान ठेवावा लागतो

मुद्दे अधोरेखित करा

आपण जेव्हा उत्तर लिहितो, तेव्हा आपल्याला संपूर्ण उत्तराचा एकेक शब्द आठवत असते. पण तशीच अपेक्षा परीक्षकाकडून करता येणार नाही. हजारो पेपर तपासणारा परीक्षक प्रत्येक शब्द काटेकोरपणे वाचून तुमच्या गुतांगुतीच्या उत्तरातून अर्थ काढून गुण देईल ही अपेक्षा धरणेच व्यर्थ आहे. त्यामुळे जर परीक्षकाला प्रश्न पडला, की नक्की सगळे मुद्दे उत्तरात आले की नाही? तर त्याला पुन्हा सगळे उत्तर वाचून बघावे लागेल; जे शक्य नाही. निव्वळ एवढ्या कारणांवरून निष्कारण एक-दोन गुण कमी मिळू शकतात. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे उत्तर लिहितानाच किंवा उत्तर लिहून झाल्यावर महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे, यात एक/दोन मिनिटे जात असली तरी त्यातून मिळणारा गुणांचा लीड निर्णायक ठरू शकतो.

टिक टिक वाजते डोक्यात

ऐन परीक्षेत वेळ पाळण्याचे मोठे आव्हान असते. परीक्षेत लिहिण्याच्या नादात वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. त्यामुळे लिहिण्याच्या गुंगीत आपल्याजवळील घड्याळ बघितल्यावर खूप वेळ गेल्याचे कळते व धक्का बसतो. मग येणारी उत्तरेही घाईघाईने सोडवावी लागतात. उत्तराची संरचना, क्रम, अक्षर व व्याकरण या सर्वांचा बोऱ्या वाजतो. यावर एकच उपाय म्हणजे मन कठोर करणे व हातातले घड्याळ काढून समोर ठेवणे. प्रत्येक प्रश्नांच्या गुणांनुसार वेळ ठरवायचा व तितक्याच वेळात कटाक्षाने उत्तर संपवायचे व संपले नाही तर तसेच सोडून पुढे सरकणे. पेपर पूर्ण करायचाच. फक्त न येणारी उत्तरे सुटली पाहिजे, इतर कुठलीही नाहीत.

नो चिटींग

असे होऊ शकते की पेपर कठीण असतो व आपाल्याला फारसे काही येत नसते किंवा कधीकधी पेपर खूपच सोपा वाटू लागतो. या दोन्ही बाबतीत उत्तरे लिहिताना वाहवत जाण्याचा संभव असतो. लिहिता लिहिता उमेदवार अशा गोष्टी लिहू लागतो, की त्याबद्दल त्याला स्वतःला खात्री नसते. एक प्रकारचा सत्य-असत्य, कल्पना-वास्तव यांचा हा खेळ असतो. पण सावधान! हा खेळ धोकादायक ठरू शकतो. परीक्षक हे अभ्यासू व अनुभवी असतात. ते अशाप्रकारचे खेळ लगेच ओळखतात. अशावेळी सर्वोत्तम धोरण म्हणजे नो चीटिंग. जे येत आहे व जितके येत आहे, ते चांगल्या प्रकारे मांडून लिहायचे. लोणकढी थापा पेरायच्या नाहीत.

उत्तरकथा

महत्त्वाचे मुद्दे आधी येऊ द्या. उत्तरातील वादविवादाचा क्रम चढता किंवा उतरता असू द्या. मोठमोठ्या व्यक्तींचे कोट्स, वाक्यप्रचार यांची अतिरेक करण्याची गरज नाही. तुम्ही काय म्हणता ते महत्त्वाचे आहे. प्रत्येक उत्तरात तुमच्याकडे काही खास माहिती, विशेष मुद्दा असेल तर अर्वजून उठून दिसेल असा मांडा. शेवटी इतर स्पधर्कांपेक्षा तुमचे उत्तर वेगळे असले पाहिजे. (differentiation) एकाच उत्तरात परस्परविरोधी माहिती वा मांडणी करू नका. उत्तरपत्रिकेतील चौकटीच्या बाहेर शब्द जाता कामा नये. ज्या ठिकाणी उत्तरे न लिहिल्यामुळे जागा रिकामी राहते त्या ठिकाणी रेघा ओढून ठेवणे गरजेचे आहे.

शेवटी महत्त्वाचे म्हणजे पेपर सोपा आहे, की कठीण याचा मनस्थितीवर परिणाम होऊ न देणे, पेपर मध्येच सोडून बाहेर न पडणे. शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणाऱ्या लढाऊ बॅट्समनप्रमाणे शेवटच्या प्रश्नापर्यंत लढाई दिली पाहिजे.






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- उत्तरांची रणभूमी

No comments:

Post a Comment