नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 13 August 2015

22) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

विषय निवडीचा यक्षप्रश्न...(लेख क्र . २२)


विषय निवडीचा यक्षप्रश्न
वैकल्पिक विषयामागील भूमिका

आपण यूपीएससी मुख्य परीक्षेचा आराखडा बघितला. त्यातील बराचसा भाग सगळ्य ांसाठी समान असला तरी प्रत्येकाला एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो. ही निवड कशी करायची, हा एक मोठा प्रश्नच उभा राहतो. या यक्षप्रश्नाची उकल करायचा प्रयत्न आपण करूया.

सामान्य अध्यनन या पेपरमध्ये अनेक विषयांची खिचडी असते. त्यातून उमेदवाराला त्या विषयाच्या महत्त्वपूर्ण बाबींचे (key points) ज्ञान आहे की नाही, हे तपासले जाते. पण त्यातून उमेदवार एखाद्या विषयाचा सखोल, मुद्देसूद व परिपूर्ण अभ्यास करू शकतो की नाही, हे लक्षात येत नाही. प्रत्यक्ष प्रशासनात एखादा प्रकल्प हाती घेतला की तो त्याच्या बारकाव्यांसकट पूर्णत्वास न्यावा लागतो. तर ही क्षमता उमेदवारांमध्ये आहे नाही हे तपासण्यासाठी वैकल्पिक विषय ठेवले. पूर्वी दोन वैकल्पिक विषय घ्यावे लागत व अर्ध्याहून जास्त गुण त्यांनाच असत. पण आता एकच ठेवला आहे व ते चांगलेच आहे. कारण पूर्वी दोन असताना विशिष्ट विषयाची मुले पास झाली तर इतरांना वाईट वाटे. त्यांच्या मनात हे कायम राही की मी तो विषय घेतला असता तर सहज पद काढले असते. आता मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय ५०० गुणांचा आहे व इतर सामान्य अध्ययन १२५० गुणांचे आहे. त्यामुळे आता वैकल्पिक विषयावर खापर फोडता येणे शक्य नाही. अशी अफवा आहे की वैकल्पिक विषय जाणार आहेत. पण अफवांवर विश्वास ठेवू नये. यूपीएससी परीक्षेत जे काही मोठे बदल होणे अपेक्षित होते, ते आता झाले आहेत. अजून दहा वर्षेतरी कोणतेही मोठे बदल आता अपेक्षित नाहीत. (एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय नाहीत. सगळ्यांनाच फक्त सामान्य अध्ययनाचे पेपर द्यावे लागतात.)

निवडीमागील कार्यरत घटक

पहिली गोष्ट म्हणजे वैकल्पिक विषयाचा निर्णय घाईघाईने घेऊ नये. सर्व पैलूंचा विचार करून मगच तो निर्णय विचारपूर्वक घ्यावा. या वर्षी देशात किंवा महाराष्ट्रात जो उमेदवार पहिला आला आहे त्याचा वैकल्पिक विषय घेणे किंवा कोणीतरी नातेवाईक तो विषय घेऊन यशस्वी झाला किंवा एखाद्या मार्गदर्शकाने यशाची खात्री दिली या कारणांनी वैकल्पिक विषयाची निवड करू नये. ते घातक ठरू शकते. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, आकलन, शैक्षणिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. एकाला जो विषय जमला तसाच तो दुसऱ्यालाही जमेल, असे काही नाही. तेव्हा सावध! कारण एकदा विषय घेतला की त्यात तुमचा बहुमूल्य वेळ, ऊर्जा व पैसा खर्च होतो. नंतर लक्षात आले की निर्णय चुकला आहे तर तो बदलता येतो पण त्यात उमेदीची वाया गेलेली वर्षे परत आणता येत नाहीत.

विकल्प काय आहेत?

यूपीएससी तुम्हाला जवळजवळ २५ प्रकारचे विविध पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणताही एक विषय वैकल्पिक विषय म्हणून घेता येतो. बी. कॉमचा पदवीधर अभियांत्रिकीचा विषयही घेऊ शकतो. अभियांत्रिकी पदवीधर साहित्यही घेऊ शकतो. त्या विषयाची पार्श्वभूमी असली पाहिजे, अशी अट नाही. तसेही स्पर्धा परीक्षांमध्ये कोणतीही पदवी मिळत नाही. विषयाशी संबंध परीक्षेपुरता असतो. एखादा डॉक्टर मेडिकल सायन्स घेऊन आयएएस झाला म्हणून त्याला आरोग्याशी संबंधितच काम मिळते, असे काही नाही. थोडक्यात तुमच्या पदवीच्या विषयाचा, तुम्ही यूपीएससी परीक्षेत घेत असलेल्या वैकल्पिक विषयाचा व तुम्ही प्रशासनात प्रत्यक्ष करीत असलेल्या कामाचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. तेजस्विनी सातपुते हिचे उदाहरण बघता येईल. तिने सूक्ष्मजीवशास्त्रात एमएससी केले. नंतर त्याच क्षेत्रात ती संशोधक म्हणून काम करू लागली. मग ती कायद्याचा अभ्यास करू लागली. तो करत असतानाच तिने यूपीएससी द्यायचे ठरवले. त्यासाठी तिने इतिहास आणि मराठी साहित्य हे विषय घेतले व आता ती आयपीएस म्हणून चांगले काम करत आहे.

वैकल्पिक विषयांची विभागणी

वैकल्पिक विषयांची विभागणी दोन गटात करता येईल. एक म्हणजे विज्ञान विषय व दुसरे म्हणजे मानव्यविद्याशाखा. विज्ञान विषय म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकीचे विषय इत्यादी. तर मानव्यविद्याशाखा म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, साहित्याविषय इत्यादी.

यातले जे विज्ञान विषय आहेत ते तांत्रिक स्वरूपाचे असल्यामुळे ते विषय घेणारे उमेदवार सहसा त्या विषयातील पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असतात. पण मानव्य विद्या विषयांचे असे नाही. ते विषय घेऊन कोणत्याही विषयाचे पदवीधर यशस्वी होतात, असे दिसते. मानव्यविद्याशाखा उमेदवारांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत, हे उघड दिसते. त्यामुळे जरी यशस्वी उमेदवार स्वत: डॉक्टर, इंजिनीअर असले तरी त्यांनी मानव्याविद्या शाखातील विषय घेतलेले दिसतात. खरेतर तत्वत: विज्ञान विषयामध्ये जास्त गुण पडणे शक्य असते, कारण त्यात जास्तीत जास्त अचूकता आणता येते. ते सामाजिक शास्त्र विषयामध्ये शक्य होत नाही. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवणे शक्य आहे, पण ते इतिहास, लोकप्रशासन या विषयांमध्ये कधीच शक्य नाही. पण ही झाली सैद्धांतिक मांडणी. वास्तवात वैकल्पिक विषयाची निवड ही एक व्यावहारिक निवड आहे. ती करताना उमेदवार त्यांचा व इतरांचा अनुभव वापरून निर्णय घेतात. विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण काढणे शक्य आहे, तसे शून्य गुण पडणे देखील शक्य असते. मानव्यविद्या विषयांमध्ये जसे पैकीच्या पैकी गुण पडत नाहीत, तसेच शून्यही गुण पडत नाहीत. कारण राज्यशास्त्र, साहित्य यात जसे अचूक उत्तर नसते तसे उत्तर पूर्णपणे चुकले, असे क्वचितच होते. या विषयांचा सामान्य अध्ययन व निबंधलेखन यात खूप उपयोग होतो, तितका तो विज्ञान विषयांचा होत नाही.

विज्ञान विषयात खोऱ्याने गुण ओढणे शक्य वाटले तरी मूळात आयोग सढळपणे गुणवाटप करत नाही. एखाद्या विषयात धबाधबा गुण मिळायला लागले तर त्या विषयाचे कान पिरगाळतो. पेपरच कठीण येतात किंवा तपासणी एकदम कठोरपणे केली जाते. हे सर्व बघून सहसा उमेदवार विज्ञान विषयांच्या नादी लागत नाहीत. त्यांना दुरूनच नमस्कार करतात.







- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- विषय निवडण्याचे निकष

No comments:

Post a Comment