नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Friday 7 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

पूर्वपरीक्षेची तयारी .....( लेख क्र .९ )

पूर्वपरीक्षेची तयारी
कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा हा पहिलाच मोठा अडथळा पार करायचा असतो. अनेकांची तिथेच विकेट पडते. त्यामुळे आपण आणखी खोलात उतरून पूर्वपरीक्षेची चर्चा करू.
...

पूर्वपरीक्षा ही पर्यायी प्रश्नांची असते. चार पर्याय दिलेली असतात व त्यातील एक अचूक ओळखायचा असतो. फोन-ए-फ्रेण्ड किंवा ५०ः ५० असे 'कौन बनेगा करोडपती' टाइप पर्याय नसतात. त्यामुळे हातघाईची लढाई होते. 'इस पार या उस पार' असा आरपारचा मामला असतो.

टेन्शन घ्यायचे नाही...

अशा वेळी पहिली 'पते की बात' म्हणजे डोक शांत ठेवलं पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन गरजेपेक्षा जास्त घेतलं तर जे प्रश्न एरवी बरोबर सुटले असते तेही चुकतात, त्यातून जास्त टेन्शन येतं.

पेपर हातात आला की चाळून बघायचा. सर्व प्रश्न जागच्या जागी आहेत की नाहीत? काही भाग छापायचा तर राहिला नाही, हे बघायचे. प्रश्नपत्रिकांचे अ, ब, क, ड असे सेट असतात. आपल्याला जो सेट मिळाला आहे तो अचूकपणे उत्तरपत्रिकेवर नोंदवला पाहिजे. नाही तर प्रश्नांचा सेट वेगळा व उत्तरे वेगळाच सेट नोंदवून लिहिली तर खेळ खल्लास.

शक्यतो पहिल्या प्रश्नापासूनच प्रश्न सोडवायला घ्यायचे. काही जणांना वाटते की सुरुवातीचे प्रश्न कठीण असले तर उगीचच टेन्शन येते त्यामुळे आपण मधलेच प्रश्न सुरू करू. पण अशा प्रकारे कठीण-सोपे प्रश्न व त्यामुळे चिंता या गोष्टी परीक्षेच्या हॉलबाहेर सोडून याव्यात.

प्रश्नाचे उत्तर सुटल्यावर लगेच उत्तरपत्रिकेवर काळे केलेले कधीही चांगले. काहीजण आधी पेपरवरच उत्तरे नोंदवून नंतर उत्तरपत्रिका काळी करतात. पण हे करताना कधीकधी अभवितपणे प्रश्नाची सीरीज चुकते. समजा दहाव्या उत्तरापासून काळे करण्याऐवजी आपण अकराव्या उत्तरापासून काळे केले तर पुढची सर्व उत्तरे चुकीची नोंदवली जातात. आणखी एक धोका म्हणजे सगळे नंतर काळे करू, असे आपण म्हणतो खरे पण वेळ भराभर जातो व वेळ संपताच उत्तरपत्रिका काढून घेतात. अशा वेळी जर काळे करायचे राहून गेले तरी खेळ खल्लास.

प्रश्नांचे वाचन काळजीपूर्वक केले पाहिजे. कारण प्रश्नांचे स्वरूप फसवे असते. खालील कोणती विधाने 'सत्य' आहेत असे कधी विचारतात तर खालीलपैकी कोणती विधाने 'असत्य' असे कधी विचारतात. घाई गडबडीत सत्याचे असत्य वाचले तर नाहक उत्तर चुकते. त्यामुळे सत्य किंवा असत्यच्या खाली अधोरेखित करून घ्यावे व त्यानुसार उत्तरापर्यंत पोहचावे.

व्यूहरचना

स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षेमध्ये उत्तरापर्यंत पोहचायच्या दोन पद्धती आहेत. पहिली, तुम्हाला अचूक उत्तर माहीत आहे व ते तुम्ही उत्तरपत्रिकेत काळे करता. पण सर्व प्रश्नांच्या बाबतीत असे होत नाही. अगदी पदप्राप्ती करणाऱ्या उमेदवारांनाही सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक माहीत नसतात. तेव्हा दुसरी पद्धती वापरावी लागते. ती म्हणजे गाळणी पद्धती (Elimination) जर पर्यायांपैकी कोणते पर्याय उत्तर ठरू शकत नाही हे ठरवता आले तरी योग्य उत्तरापर्यंत पोहचता येते. या दोन्हींचा वापर करायला हवा.

वेळेच व्यवस्थापन

पूर्वपरीक्षेत वेळेच योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. काही उमेदवार हे भान विसरतात व काही प्रश्न अचूक सोडवायच्या नादात त्यांना सर्व प्रश्न वाचताच येत नाही. समजा त्यांनी शंभरापैकी ऐंशीच प्रश्न सोडवले व त्यात अचूकता ठेवली तरी ही पद्धत योग्य नाही. मुळात स्पर्धा परीक्षेचे स्वरूपच असे असते की जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्याशिवाय कट ऑफ पार करता येत नाही. हे ऐंशी प्रश्न सोडवणारे उमेदवार जेव्हा परीक्षा हॉलच्या बाहेर येऊन उरलेले वीस प्रश्न बघतात तेव्हा डोक्याला हात लावतात कारण बऱ्याचदा ते प्रश्न एकदम सोपे असतात.

वेळ संपायच्या पाच ते दहा मिनिटे आधी तरी पेपर संपला पाहिजे. म्हणजे मग आपला रोल नंबर, सीरीज, व इतर तपशील योग्य भरलेले आहेत की नाही हे पुन्हा तपासता येते. परीक्षकांनी दिलेल्या सूचना काटेकोर पाळल्या आहेत की नाहीत हेही बघावे लागते, त्यात हलगर्जी चालत नाही.

पहिला पेपर झाल्यावर लगेच एक-दीड तासाच्या गॅपनंतर पुढचा पेपर असतो. त्यामुळे पेपर झाल्यावर लगेच काहीतरी हलके खाऊन पुढच्या पेपरच्या नोट्सची उजळणी करावी, आधीचा पेपर कसा गेला याची चर्चा करत राहू नये कारण त्यातून बहुमूल्य वेळ वाया जातो.






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- पूर्वपरीक्षेची अपूर्वाई