नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Sunday 9 August 2015

18) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

अंतिम निकालाचा क्षण...(लेख क्र . १८)

अंतिम निकालाचा क्षण
यशाचा ध्यास आणि प्रयत्न

निकालानंतर यशस्वी विद्यार्थी एकाएकी सेलिब्रिटी होतात. एका दिवसात त्यांचे आयुष्य बदलून जाते. या सगळ्या लखलखाटात त्यांनी घेतलेली मेहनत, यशाचा ध्यास व प्रयत्न बहुतांश वेळा समोर येत नाहीत. निकालाकडे बघितले तर, दिसेल की यशस्वी उमेदवारांना अगदी पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, तरी ते ध्यास न सोडता यश मिळेपर्यंत प्रयत्न करतात. हे करताना अडचणी येत नाहीत, असे नाही. ग्रामीण भागातील अनेक मुले शहरामध्ये अभ्यासासाठी राहतात, मुलींना तर तेही शक्य होत नाही. मार्गदर्शन घेण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. तेही काहींसाठी अशक्य असते. पुस्तके वेळेवर मिळणे, अभ्यासासाठी चांगली जागा उपलब्ध असणे अशा छोट्याछोट्या गोष्टीही अनेकांसाठी मोठ्या ठरतात.

घरच्यांचा पाठिंबा व सहकार्य

घरच्यांचा पाठिंबा नेहमीच महत्त्वाचा ठरतो. जर घरच्यांना विश्वासात घेतले असेल, तरच हा कठीण प्रवास सोपा होतो. यशस्वी उमेदवारांच्या यशावरच्या प्रतिक्रिया वाचल्या, तर त्यांनी आपल्या घरच्यांचे मानलेले आभार हा समान मुद्दा आहे. कारण शेवटी मार्गदर्शन, पुस्तके, वाचायची जागा हे बाह्यघटक आहेत. ते एकवेळ जुळवता येतात, पण घरून पाठिंबा नसेल, तर मानसिक स्वास्थ्य ठिक राहात नाही आणि मग कितीही वेळा (आणि वर्षे) अभ्यास केला, तरी यश अशक्य ठरते. यशस्वी उमेदवारांची आणखी एक समान बाब म्हणजे त्यांनी दूरवर दृष्टी ठेवून दीर्घकालीन नियोजन केलेले असते. त्यामुळे त्यांचे काही निर्णय चुकल्यासारखे वाटले किंवा चुकले तरी ते अंतिम यशापर्यंत पोहोचतातच. या सर्व उमेदवारांनी परीक्षा द्यायचा निर्णय स्वतः घेतलेला असतो किंवा घरच्यांनी त्यांना सांगितले असते. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांना हा निर्णय पटलेला असतो.

अभ्यास कुठे केला?

यशस्वी उमेदवारांची पदवीची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. त्यांनी निवडलेले वैकल्पिक विषयही वेगवेगळे आहेत. त्यांच्या अभ्यासाची पद्धत व यशाचा मार्गही वेगळा असेल, पण एक सामायिक गोष्ट म्हणजे त्यांनी शहरांमध्ये अभ्यास केला किंवा त्यांनी अभ्यासाचा महत्त्वाचा टप्पा शहरात जाऊन समजून घेतला. यात ग्रामीण भागाला कमी लेखण्याचा भाग नाही. पण उत्तम ग्रंथालये, मार्गदर्शन व सराव परीक्षेची सोय शहरांमध्ये असते हे खरेच आहे. या यशस्वी उमेदवारांपैकी अनेकांनी सरकारने चालवलेल्या प्रशिक्षण संस्थांचा कधी ना कधी लाभ घेतलेला असतो, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे खासगी मार्गदर्शन घेण्याची ऐपत नाही, त्यांच्यासाठी सरकारने मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर अशा ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे स्थापन केली आहेत. तिथे पुस्तके, वाचनालय, हॉस्टेल व विद्यावेतन अशी सोय केली जाते. ग्रामीण विद्यार्थ्यांना तर याचा खूपच फायदा होतो.

त्याशिवाय या उमेदवारांनी शक्य तेथून व शक्य तेवढ्यांकडून यशासाठीची सामग्री मिळवलेली असते. त्यात कोणताच मिंधेपणा नाही व मान-अपमानाचा मुद्दा नाही. तुमचा हेतू जर उदात्त असेल, तर विद्यार्जनासाठी मदत घ्यायची लाज वाटू नये आणि घेणाराच एके दिवशी देणारा होतो. ज्ञान ही जगातील एकमेव गोष्ट आहे, जी वाटल्याने वाढते. निकालातील बहुतेक जण एकमेकांना ओळखतात व त्यांनी एकमेकांना मदत केलेली असते. त्यातूनच सगळ्यांना यश मिळते.

आज अपयश, उद्या यश

यशस्वी उमेदवारांमागे अनेक अपयशी होणारेही असतात. पण अशा कोणत्याही मोठ्या परीक्षेत ते होणारच. याचा अर्थ त्यांनी परीक्षा देऊन चूक केली, असा होत नाही. मुळात या परीक्षेतून इतकी निवडक मुले यशस्वी होतात, की अपयशी उमेदवारांना अपयशी तरी कसे म्हणायचे? आजचे यशस्वी हे काल अपयशी होते व आजचे अपयशी उद्याचे सत्कारमूर्ती असणार आहेत. कोणी राखीव यादीतून पद काढतात. जे उमेदवार पद स्वीकारत नाहीत, त्यांच्या जागा राखीव यादीतून भरल्या जातात. त्याचा निकाल एका वर्षाने लागतो. तेव्हा पद न मिळालेले किंवा हवे ते पद न मिळालेले पुन्हा जोमाने कामाला लागतात. डॉ. गणेश पोटे हा आधी उपजिल्हाधिकारी झाला, त्यानंतर त्याने भारतीय राजस्व सेवा (IRS) प्राप्त केली. यावेळी तो मुलाखतीला होता, पण अंतिम यादीत स्थान मिळवू शकला नाही. त्याने दिलेली प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहे.

गुजर गया दिन अपनी तमाम रौनक लेकर

जिंदगी ने वफा की तो कल फिर सिलसिले होंगे






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- ई-ज्ञानाचा खजिना

No comments:

Post a Comment