नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Sunday, 9 August 2015

16) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

यूपीएससी निकालाची ‘केस स्टडी’...(लेख क्र . १६)

यूपीएसी निकालाची ‘केस स्टडी’
 
निकालाचे घोषणापत्र

यंदा एका वर्षातच यूपीएससीची परीक्षा व निकाल प्रक्रिया पूर्ण झाली. अलीकडेच पुढील पूर्व परीक्षेच्या आधी अंतिम निकाल लावला जातो. जर पूर्व परीक्षेच्या आत अंतिम निकाल लागला नाही, तर उमेदवारांना पुढच्या परीक्षेला जायचे की नाही, हे कळणार नाही किंवा पूर्वपरीक्षेची तयारीही योग्यप्रकारे करता येणार नाही. आयोगाने आपले काम अधिकाधिक पद्धतशीर करत आणले आहे, असे दिसते. कारण २९ जूनला मुलाखती संपल्या व ४ जुलैला लगेच अंतिम निकाल घोषित केला. इतक्या कमी दिवसांत यापूर्वी कधीही निकाल लागला नव्हता. पूर्वी उमेदवार निकाल कधी येईल या उत्सुकतेने आयोगाची वेबसाइट उघडून बसायचे. पाच-पाच मिनिटांनी निकाल लागला का हे तपासत. कारण पूर्वी आयोग कधीही निकाल जाहीर करत असे. एकदा तर मध्यरात्री निकाल लागला होता. यावेळी मात्र आयोगाने निकालाची तारीख आदल्या दिवशी जाहीर केली व शनिवारी दुपारी एक वाजता तो अयोगाच्या वेबसाइटवर (www.upsc.gov.in) जाहीर झाला. या तत्परतेसाठी आयोग प्रशंसेस प्राप्त आहे.

जागावाटप

आता आपण पदांची वाटणी कशी आहे बघू या. पदांचा आकडा गेल्या काही वर्षांत वाढत चालला आहे. त्यापैकी ज्यांना अखिल भारतीय सेवा म्हणतात म्हणजे प्रशासकीय सेवा, परराष्ट्र सेवा व पोलिस सेवेची पदे पुढीलप्रमाणे. आयएएस - १८०, आयएफएस - ३२, आयपीएस - १५०. त्यानंतर केंद्रीय सेवा येतात. त्यात दोन प्रकार आहे. गट 'अ' आणि गट 'ब'. यातील गट 'अ' या प्रकारच्या सेवांमधील पदांची संख्या वाढती आहे. यावर्षी ती तब्बल ७१० होती. तर 'ब' गटाची २९२ पदे होती. त्यातील मोठा वाटा भारतीय महसूल सेवेचा (आयआरएस) आहे. भारत सधन होत असतानाच सरकारचा करमहसूल वाढत चालला आहे व त्याचबरोबर करसंकलनासाठीची व्यवस्था व्यापक होत चालली आहे.

६९ जणांचे निकाल राखून ठेवले आहेत. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोणते ना कोणते प्रमाणपत्र राहून गेलेले असते किंवा प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी असतात. आरक्षणासंबंधी जे प्रमाणपत्र लागते, जातीचे किंवा इतर वर्गांच्या बाबतीत नॉन क्रिमीलेयरच्या प्रमाणपत्रांमध्ये या समस्या निर्माण होतात. केंद्राचे प्रमाणपत्र वेगळे असते व राज्यांचे वेगळे. यूपीएसीच्या परिक्षांसाठी केंद्राची प्रमाणपत्रे लागतात. हे बऱ्याच उमेदवारांना माहीत नसते आणि त्यामुळे कधीकधी ती प्रमाणपत्रे सादर करेपर्यंत निकाल राखून ठेवला जातो.

निकालाचे विश्लेषण

नुकताच लागलेला निकाल हा आपल्याला खूप काही शिकवतो. पहिले म्हणजे मुलींमध्ये जे यशप्राप्तीचे प्रमाण आहे, ते एकूण निकालांत कमी असले तरी वरच्या रँकमध्ये मुलींचे प्रमाण चांगले आहे. मुलींसाठी प्रशासकीय सेवा अत्यंत चांगले करीअर ठरू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही चांगले यश मिळवले आहे. त्यातून दिसते की ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. त्यांना योग्य मार्गदर्शनाची व सुविधांची जोड मिळाली, तर ते यशापर्यंत पोहोचू शकतात. मराठी माध्यमातून परिक्षा देणाऱ्यांचा विचार करता निकाल चांगला आहे. उदा. श्रीकांत सुसे याने मराठी माध्यमातून पद काढले आहे. जे अपंग आहेत, त्याच्यासाठी पण निकाल चांगला आहे. जी मुलगी अखिल भारतीय स्तरावर पहिली आली आहे, ती अपंग आहे. पद मिळवण्यासाठी तिने मोठा न्यायालयीन लढा दिला. त्यातून तिने स्वतः पद प्राप्त केलेच, पण पुढच्यांचाही मार्ग मोकळा करून दिला. हा निकाल नीट बघितला तर असे दिसेल की सर्वच शाखांच्या पदवीधरांना यश प्राप्त झाले आहे. उदा. अबोली नरवणे हिचा पदवीचा विषय होता, अर्थशास्त्र व तिने राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय घेऊन यश संपादन केले. निकालातून हेही दिसते की अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या मुलांनी देदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यातून या सनदी सेवा परीक्षेतील पारदर्शकता व समान संधी दिसून येते. निकालातून असे दिसेल की महाराष्ट्राला लोकसंख्येच्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व विभागांतून मुलांनी बाजी मारली आहे.

एकेकाळी आयोगाशी संपर्क साधण्यासाठी उमेदवांना घाईगडबडीने दिल्ली गाठावी लागे. सुदैवाने तो काळ आता मागे पडला आहे. आयोगाने संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत संपर्क साधून आपल्या समस्या मांडता येतात. संपर्क क्रमांक : ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/२३०९८५४३.






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- यशासारखे यश नाही

15) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

उजळणीने उजळतील दाही दिशा....( लेख क्र . १५)

उजळणीने उजळतील दाही दिशा
ज्ञानाला उजाळा देणारी उजळणी

ज्ञान म्हणजे एखादी चकचकीत भांडे समजू या. पण आपण ते कपाटात ठेवले की काळवंडते. तेव्हा ते वेळोवेळी घासूनपुसून ठेवावे लागते. तेव्हा कुठे ते लखलखते. ज्ञानाचे तसे आहे, उजळणीनेच ते लखलखते. आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला समजते व कायमची लक्षात राहील असे वाटू शकते. पण काही दिवसांनी स्मरणशक्ती क्षीण होते व त्या गोष्टीचे विविध कंगोरे बोथट होतात. उजळणीमुळे या समस्येवर मात करता येते. उजळणीमुळे एखादी गोष्ट पेपरवर छापावी तसे ज्ञान आपल्या मेंदूवर कोरले जाते. परीक्षेच्या वेळी अक्षरशः आपण कोणत्या पानावर बाण काढून काय लिहिले आहे हे डोळ्यासमोर दिसते (कॉपी करायची तर बातच नाही). याचा चांगलाच फायदा होतो. ऐन परीक्षेत आठवेल की नाही ही भीतीच संपते.

उजळणीचा एक मोठा फायदा म्हणजे आपण अभ्यासात कुठवर मजल मारली आहे व अजून किती पल्ला बाकी आहे याचा आढावा घेणे सोपे जाते. उजळणीमुळे आपण किती अभ्यास केला आहे हे तपशिलासकट लक्षात राहते. त्याचा मोठा फायदा म्हणजे आधीच काय ज्ञान आहे हे माहीत असले की नवीन ज्ञान कोणते हे लक्षात येते. ते बरोबर वेचून नोट्समध्ये जोडून आपण त्या परिपूर्ण करू शकतो. जे उमेदवार याप्रकारे उजळणी करीत नाहीत, त्यांना आपण पुढे जातो आहोत की मागे की एकाच ठिकाणी साचून राहिलो आहोत हे सांगता येत नाही. हा एक प्रकारचा चकवा असतो.

अभ्यासातील चकवा

या चकव्याचे लक्षण म्हणजे असे उमेदवार वर्षभर पूर्णवेळ अभ्यास करूनही तक्रार करतात की अभ्यास संपतोय असे वाटत नाही. उलट असे वाटते की कितीही अभ्यास करा कमीच पडतोय. खरे तर एका वर्षात वाचण्याजोगे सर्वच वाचून झालेले असते. पण ते ज्ञान धरून न ठेवल्याने (नोट्स न काढणे) किंवा नोट्स काढल्या व पण ज्ञानाचे व्यवस्थापन नीट न केल्याने (उजळणी) ते विसरायला होते. असे हे उजळणीचे महात्म्य आहे.

सराव-शेवटचा टप्पा

आता अभ्यासाचे तीन टप्पे पाहिल्यावर शेवटचा व तितकाच महत्त्वाचा टप्पा पाहायला हवा, तो म्हणजे सराव. बरेचसे उमेदवार पहिल्या तीन टप्प्यांतच इतके गुंतून जातात की ते या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतच नाहीत. पण हा टप्पा पार पाडल्याशिवाय यश नाही. वेळोवेळी चाचण्या द्यायला हव्यात. त्यात किती गुण मिळतात हे बघायला हवे. त्या गुणांची इतरांच्या गुणांशी तुलना करून बघायला हवी. इथे उमेदवारांची एक नेहमीची पळवाट असते, की अभ्यास तर होऊ द्या, मग चाचण्या देऊच. पण मग ती वेळच कधी येणार नाही.

स्पर्धापरीक्षांचा आवाका पाहता अभ्यास असा कधीच होत नाही. ५० टक्क्यांच्या आसपास गुण पडले की पदप्राप्ती होते. याचा अर्थ अगदी यशस्वी उमेदवारांचाही अर्धाच अभ्यास झालेला असतो. अभ्यास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ती निवड झाल्यानंतरही चालू राहते. इथे एका विशिष्ट चौकटीत आपण चर्चा करीत आहोत. एखादा विषय वाचून, टिपण काढून व उजळणी करून झाला की त्याच्यावरचे प्रश्न सोडवून आपण जे करतो आहोत ते गुणांमध्ये प्रतिबिंबित होत आहे की नाही हे बघितले पाहिजे. आणि अभ्यास गुणामध्ये प्रतिबिंबित होत नसेल तर तसे का होत नाही हे शोधले पाहिजे (failure analysis). जो घटक दुर्बळ वाटतोय, त्याचा नव्याने अभ्यास करून चाचणीला सामोरे गेले पाहिजे. हे सर्व अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करायचे. त्यात भावनिक गुंता आणायचा नाही. चाचणीत कमी गुण मिळाले म्हणून निराश व्हायची किंवा जास्त गुण मिळाले म्हणून हवेत जायची काही गरज नाही. या गोष्टीकडे matter of fact पद्धतीने पाहायचे.

सराव परीक्षेतून आपण किती पाण्यात आहोत हे कळते. 'झाकली मूठ सव्वालाखाची' असे होता कामा नये. 'परीक्षेत मी उस्फूर्तपणे प्रश्न सोडवेन' हा दृष्टिकोन महागात पडू शकतो. भरपूर सराव केल्यावरही उस्फूर्ततेला स्पर्धा परीक्षांमध्ये वाव असतोच. कारण परीक्षेत काय येईल हे काही सांगता येत नाही, तेव्हा शेवटी उस्फूर्तता दाखवावी लागतेच. सरावामुळे वाचतानाच त्यावर प्रश्न कशाप्रकारे विचारला जाऊ शकेल, असा विचार करायची सवय लागते. त्यामुळे विचारप्रक्रियेला चालना मिळून परीक्षेच्या दिशेने अभ्यास होतो.






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- यूपीएससी निकालाची ‘केस स्टडी’

14) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

अभ्यासाचे जंतरमंतर .....( लेख क्र . १४)

अभ्यासाचे जंतरमंतर
आपण अभ्यासाचे जे चार कोन त्यांची चर्चा सुरू केली होती. ते म्हणजे वाचन, नोट्स, उजळणी व सराव. त्यातील नोट्सची चर्चा आपण आधी पूर्णत्वाला नेऊ. नोट्स काढताना त्या वेगळ्या कागदांवरच काढल्या पाहिजेत असे काही नाही. ते वेळखाऊ वाटत असेल तर एखादे पुस्तक प्रमाण मानून त्यातच अधोरेखित करायचे. त्या पुस्तकातच समासात नवीन मुद्दे जोडायचे. हे करताना जागा पुरली नाही तर त्या पुस्तकात बाहेरूंन पानं घालायची. या पद्धतीनेही नोट्स काढल्या तरी चालतात.

नाय, नो, नेव्हर

नोट्स काढताना कधीच त्या दुसऱ्या कोणत्या तरी नोट्सवरून काढू नका. पुस्तकातून नोट्स काढतात, नोट्समधून नव्हे. काहींना नोट्सची लपवालपवी करायला आवडते. त्याची काही गरज नाही. बिनधास्त कोणालाही दाखवा. तुमच्या नोट्स समोरच्याला काहीच उपयोगाच्या नसतात. नोट्स काढायची कोणा इतरांची शैली कॉपी करायचा प्रयत्न करू नका, स्वतःची शैली विकसित करा. किंवा ती आपोआप विकसित होत जाते. इतके सगळे नोट्सपुराण लावले आहे कारण एकदा नोट्स तयार झाल्या की स्पर्धापरीक्षेच्या इमारतीचा ढाचाच तयार झाल्यासारखे आहे. आता त्यामध्ये फक्त रंग भरायचे काम करायचे असते (तपशिल) पण ते तुलनेने सोपे असते. कोणी म्हणेल की एवढे सव्यापसव्य करण्यापेक्षा थेट लक्षातच ठेवायचे ना वाचलेले! ही कल्पना वाटते तेवढी सोपी नाही. अख्खेच्या अख्खे पुस्तक पाठ करून परीक्षेला जायला स्पर्धापरीक्षा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा नव्हे. तिथे अभ्यासक्रम अगदीच मर्यादीत असतो. स्पर्धापरीक्षेत अभ्यासक्रमाचा विस्तार (range) खूप मोठा असतो. अशावेळी निव्वळ पाठांतर करून लक्षात ठेवायचा पर्याय बाद होतो. तेव्हा सेकंड बेस्ट पर्याय म्हणजे नोट्स काढणे.

अचूकतेच्या वाटेवर

नोट्सचा आणखी एक फायदा म्हणजे दोन वेगळया गोष्टीतील दुवे शोधून (linkages) त्या गोष्टीतील आंतरसंबंध जोडणे सोपे जाते. नोट्स नसतील तर नुसत्या मनातल्या मनात ही उलाढाल करणे जड जाते. नोट्समुळे होणारा एक मोठा मानसिक फायदा म्हणजे काहीतरी साध्य केल्याचे समाधान. एरवी अभ्यास ही अमूर्त प्रक्रिया आहे. अशावेळी नोट्स नसतील व एखादयाने प्रश्‍न विचारला की गेले चार महिने काय केले? तर निश्‍चित सांगता येत नाही. पण नोट्स असतील तर त्या पुरावा म्हणून मांडता येतात.

नोट्स काढताना एखाद्या प्रकरणाचे प्राण/मर्म काढून घ्यावे लागते. आपोआपच त्या विषयाची मनात चांगली घुसळण होते, तेव्हाच मर्म सापडते. या प्रक्रियेतच अर्धा अभ्यास होतो. नुसतं वाचून पुढे जाण्यापेक्षा ही प्रक्रिया जास्त फलदायी ठरते.

नोट्स लिहून काढण्याच्या प्रक्रियेतून तो अभ्यास आपल्या शरीरात भिनतो. writing makes man perfect असं ते म्हणतात, ते याच अर्थाने.

नोट्स लिहिण्याच्या निमित्ताने हात लिहिता होतो व स्वतःची एक लेखनशैली विकसित होते. तिचा यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत खूपच फायदा होतो. एरवी मुख्य परीक्षेत तीन तासांत पाच हजार शब्द लिहिणे हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!

कधी कधी स्पर्धापरीक्षेत असे होते की एखादी पोस्ट मिळते पण ती खालची असते व उमेदवाराला इच्छा असते की आपण पुन्हा नशीब अजमावून पाहू. म्हणून तो पुन्हा बसतो. पद कायम ठेवून बसता येते. त्यामुळे बहुसंख्य यशस्वी उमेदवार पुन्हा बसतातच. अशा वेळी पुन्हा सगळे नव्याने वाचायला वेळ नसतो. पण जर नोट्स हाताशी असतील तर कमी वेळातही सुधारणा करून वरचे पद हस्तगत करता येते.

या सर्व चर्चेतून ही गोष्ट स्पष्ट होईल की नोट्स काढणे हा जरी वरवर लाँगकट वाटला तरी प्रत्यक्षात तो शॉर्टकट आहे. नोट्स काढल्याने अभ्यासक्रमावर जी पकड येते ती इतर कशानेही येत नाही.

उजळणीचे कर्मकांड

आतापर्यंत आपण दोन टप्पे पार पाडले. वाचन व नोट्स. आता तिसऱ्या टप्प्याकडे वळू, ती म्हणजे नोट्सची उजळणी. नोट्सबद्दलचा आग्रह बघून काही उमेदवार रडतखडत का होईना नोट्स काढतात पण मग त्यांची उजळणी करायला कंटाळा करतात. जर वेळोवेळी उजळणी केली नाही तर नोट्स काढूनदेखील फायदा नाही.

उजळणी म्हणजे नोट्स फक्त वाचून काढायच्या. साधारणतः आठवड्याने किंवा दहा दिवसांनी हे कर्मकांड न चुकता करायचे. त्यादिवशी नवीन वाचन नाही झाले तरी चालेल पण उजळणी करायचीच. नोट्स जर थोडक्यात काढल्या असतील तर सगळ्या नोट्सचीसुद्धा एका दिवसात सहज उजळणी होते. उजळणी करताना एकेक शब्द, एकेक वाक्य वाचताना डोळ्यासमोर पुस्तकाचे पान तरळू लागते. अनेक खिडक्या उघडतात. अर्थात हे सगळे स्वतःच्या नोट्स उजळणी करताना होते. दुसऱ्याच्या रेडीमेड नोट्सची उजळणी करायला घेतलीत खिडक्या उघडणार नाहीत तर बंद होतील.

उजळणी करताना अधोरेखित केलेले, टिपणे काढलेले असे सर्वच वाचायचे व तेही अगदी नियमितपणे. जसे रंग देणारे रंगाचा पहिला हात दिल्यानंतर काही दिवसांनी दुसरा हात देतात. मगच रंग पक्का बसतो. तसाच हा प्रकार आहे. उजळणी केल्यानेच अभ्यास पक्का होतो.

उजळणी केल्याने शब्द व त्यांचा क्रम डोळयात फिट बसतो, विसरू म्हणता विसरता येत नाही. पाठांतराला उजळणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- उजळणीने उजळतील दाही दिशा

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

अभ्यासाची बाराखडी .....( लेख क्र . १3)

अभ्यासाची बाराखडी

दिसामाजी काही तरी लिहावे

आपण जे काही वाचतो त्याच्या नोट्स काढणे अत्यंत आवश्यक आहे. मागच्या प्रश्नप​त्रिका अभ्यासक्रम समोर ठेवून त्या प्रकाशात नोट्स काढायच्या. काहींना हे काम वेळखाऊ व अनेकांना कंटाळवाणे वाटते. नुसतं वाचायला मजा येते व वाचन भराभर होते. त्यामुळे अनेक पुस्तकांचा फडशा पाडून स्वतःलाच खूप वाचल्याचे समाधान देता येते. पण हे समाधान फसवं असतं. इतकी पुस्तकं वाचली की यश असा काही स्पर्धापरीक्षांमध्ये फॉर्म्युला नाही आहे. त्या पुस्तकातील किती समजलं व त्यातील किती लक्षात राहिलं हे निर्णायक ठरतं. तेव्हा संख्येचा नाद सोडा. कमी पुस्तके वाचली तर चांगली ज्ञानप्राप्ती होऊ शकतेच. शेवटी जास्त अभ्यास करून कमी समजून घ्यायचं नाही, तर कमी अभ्यासात जास्त समजले पाहिजे. थोडक्यात नोट्स काढल्या पाहिजेत. अगदी रोजच्या वृत्तपत्राच्याही नोट्स काढल्या पाहिजेत. पाठपुस्तकांच्या व संदर्भ ग्रंथांच्याही.

नो शॅार्टकट्स

यावर काही जण असा शॉर्टकट काढतील आदल्या वर्षी यशस्वी झालेल्या मुलांच्या नोट्स रेडीमेड वापरल्या तर, तर हा टप्पाच गाळता येईल. सावधान! हा शार्टकट लाँगकट ठरू शकेल. कारण प्रत्येक जण आपापल्या आकलन क्षमतेप्रमाणे आपल्या भाषेत नोटस् काढतो. त्यामुळे एकाचे कपडे जसे दुसऱ्याला फिट होत नाहीत तसे एकाच्या नोट्सचा दुसऱ्याला उपयोग नाही. कारण ज्याने नोट्स काढल्या असतात त्याने 'त्याला' महत्त्वाचे वाटणारे, 'त्याच्या' लक्षात न राहणारे मुद्दे वेगवेगळया आकृत्या काढून नोट्स मध्ये घेतले असतात. इथे धोका असा आहे की त्याने ज्या नोट्स काढल्या आहेत ते तुम्हाला आधीच माहिती आहे व जे त्याने नोट्समध्ये उतरवले नाही ते तुम्हाला माहीत नाही. (mismatch) खेळ खल्लास. सारांश अशा की ज्याच्या नोट्स त्यालाच कळतात. इतरांनी त्या वाचून काडीभरही फायदा होत नाही. स्वतःच्या नोट्स स्वतःच बनवलेल्या बऱ्या.

नोट्स काढायचे तंत्र

आता नोट्स कशा काढायच्या? तर नोट्स काढायच्या वेगवेगळया पद्धती आहेत. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे त्या वापरू शकतो. पारंपरिक पद्धत म्हणजे वेगळ्या पानांवर नोट्स काढायच्या. वहीत काढण्यापेक्षा सुट्या पानांवर काढणे बरे पडते. कारण त्याचे फायलिंग करणे सोपे जाते. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तरपत्रिकेवर रेघा नसतात. त्यामुळे नोट्स काढतानाच रेघा नसलेल्या कागदांवर नोट्स काढल्या तर आपोआपच सराव होतो. ज्या पेनने मुख्य परीक्षा लिहीणार त्याच पेनने नोट्स काढायच्या. हे आपण फारच तपशिलात जातो असे एखाद्याला वाटेल. पण म्हणतात ना, God is in details. बऱ्याच वेळा उमेदवार नोट्स काढताना साधे पेन वापरतात व परीक्षेआधी महागाचे भारी पेन घेतात. पण त्या पेनची सवय नसल्याने चुकल्याचुकल्यासारखे वाटते व एकाग्रता भंगते.

मर्मबंधातली ठेव

नोट्स काढायच्या म्हणजे एखादया गोष्टीचे मर्म मुठीत पकडणे. त्यामुळे संपूर्ण पानाचे किंवा धड्याचे मर्म जाणून ते नोट्स मध्ये पकडता आले पाहिजे. नोट्स वाचल्या की तो धडा जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे. हे ज्यांना कळत नाही, ते नोट्स काढताना पट्टी घेऊन बसतात व सगळ्या ओळी अधोरेखित तरी करतात किंवा जशाच्या तशा नोट्समध्ये उतरवून काढतात. याचा उपयोग नाही. नोट्स नेहमी थोडक्यातच पाहिजेत. एखादया धड्यातील मर्माचा मुद्दा (key point) एखाद्या उताऱ्यातील मर्माचे वाक्य (Trigger sentence) व एखाद्या वाक्यातील मार्मिक शब्द (trigger word) ओळखता आला पाहिजे. तो तसा ओळखून नोट्समध्ये घ्यायचा. अख्खीच्या अख्खी वाक्य उतरवायची गरज नाही. संकल्पनांना छोटे रूप दयायचे. असे करताना आकृत्या, फ्लो चार्ट, बाण यांचा सढळ वापर करायला काहीच हरकत नाही. असंही नुसते शब्द वाचून वाचून कंटाळा येतो. आकृत्यांच्या सहाय्याने लक्षात ठेवणे सोपे जाते. नोट्स काढताना अक्षरही अगदी मोत्यासारखे आले पाहिजे अशी काही गरज नाही. आपल्याला नंतर वाचता आले म्हणजे झाले.

काळा, निळा, हिरवा अशा वेगवेगळया रंगाचे पेनही वापरायला हरकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायला सोपे जाते. नोट्स काढताना एकाच भाषेत काढल्या पाहिजे असेही काही नाही. इंग्रजीतून नोट्स काढणारांनी अधूनमधून देवनागरी शब्द, वाक्य लिहिली तरी चालतील. मराठीतून नोट्स काढणारांनी रोमन लिपीचा वापर केला तरी चालेल. तेवढेच ते आकर्षक होते व लक्षात ठेवायलाही सोपे जाते.

नोट्स थोड्या सुटसुटीत काढायच्या. दोन्ही बाजूला थोडी जागा सोडायची. कारण आपण काढलेल्या नोट्स काही अचूक नसतात. ती फक्त एक बाह्य संरचना असते. जेव्हा त्या विषयाबद्ल नवीन माहिती मिळते तेव्हा ती त्या नोट्समध्येच अपडेट करायची. हे अपडेट करायचे काम सातत्याने करायचे व तिथेच करायचे. उदा. तुम्ही अकबराच्या कारकिर्दीवर नोट्स काढल्या. तर त्यातच अपडेट करत जायचे. प्रत्येक वेळेला नवीन माहिती मिळाली की वेगळ्या नोट्स काढायच्या नाहीत. तसे केले नंतर नोट्सचे व्यवस्थापन जड जाईल व शिवाय असे वाटू लागले की इतिहासात बरेच अकबर होऊन गेले. याचाच अर्थ नोट्सचा एकच सेट असला पाहिजे.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- अभ्यासाचे जंतर मंतर

Friday, 7 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

पूर्वपरीक्षेची तयारी .....( लेख क्र .९ )

पूर्वपरीक्षेची तयारी
कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षा हा पहिलाच मोठा अडथळा पार करायचा असतो. अनेकांची तिथेच विकेट पडते. त्यामुळे आपण आणखी खोलात उतरून पूर्वपरीक्षेची चर्चा करू.
...

पूर्वपरीक्षा ही पर्यायी प्रश्नांची असते. चार पर्याय दिलेली असतात व त्यातील एक अचूक ओळखायचा असतो. फोन-ए-फ्रेण्ड किंवा ५०ः ५० असे 'कौन बनेगा करोडपती' टाइप पर्याय नसतात. त्यामुळे हातघाईची लढाई होते. 'इस पार या उस पार' असा आरपारचा मामला असतो.

टेन्शन घ्यायचे नाही...

अशा वेळी पहिली 'पते की बात' म्हणजे डोक शांत ठेवलं पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन गरजेपेक्षा जास्त घेतलं तर जे प्रश्न एरवी बरोबर सुटले असते तेही चुकतात, त्यातून जास्त टेन्शन येतं.

पेपर हातात आला की चाळून बघायचा. सर्व प्रश्न जागच्या जागी आहेत की नाहीत? काही भाग छापायचा तर राहिला नाही, हे बघायचे. प्रश्नपत्रिकांचे अ, ब, क, ड असे सेट असतात. आपल्याला जो सेट मिळाला आहे तो अचूकपणे उत्तरपत्रिकेवर नोंदवला पाहिजे. नाही तर प्रश्नांचा सेट वेगळा व उत्तरे वेगळाच सेट नोंदवून लिहिली तर खेळ खल्लास.

शक्यतो पहिल्या प्रश्नापासूनच प्रश्न सोडवायला घ्यायचे. काही जणांना वाटते की सुरुवातीचे प्रश्न कठीण असले तर उगीचच टेन्शन येते त्यामुळे आपण मधलेच प्रश्न सुरू करू. पण अशा प्रकारे कठीण-सोपे प्रश्न व त्यामुळे चिंता या गोष्टी परीक्षेच्या हॉलबाहेर सोडून याव्यात.

प्रश्नाचे उत्तर सुटल्यावर लगेच उत्तरपत्रिकेवर काळे केलेले कधीही चांगले. काहीजण आधी पेपरवरच उत्तरे नोंदवून नंतर उत्तरपत्रिका काळी करतात. पण हे करताना कधीकधी अभवितपणे प्रश्नाची सीरीज चुकते. समजा दहाव्या उत्तरापासून काळे करण्याऐवजी आपण अकराव्या उत्तरापासून काळे केले तर पुढची सर्व उत्तरे चुकीची नोंदवली जातात. आणखी एक धोका म्हणजे सगळे नंतर काळे करू, असे आपण म्हणतो खरे पण वेळ भराभर जातो व वेळ संपताच उत्तरपत्रिका काढून घेतात. अशा वेळी जर काळे करायचे राहून गेले तरी खेळ खल्लास.

प्रश्नांचे वाचन काळजीपूर्वक केले पाहिजे. कारण प्रश्नांचे स्वरूप फसवे असते. खालील कोणती विधाने 'सत्य' आहेत असे कधी विचारतात तर खालीलपैकी कोणती विधाने 'असत्य' असे कधी विचारतात. घाई गडबडीत सत्याचे असत्य वाचले तर नाहक उत्तर चुकते. त्यामुळे सत्य किंवा असत्यच्या खाली अधोरेखित करून घ्यावे व त्यानुसार उत्तरापर्यंत पोहचावे.

व्यूहरचना

स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षेमध्ये उत्तरापर्यंत पोहचायच्या दोन पद्धती आहेत. पहिली, तुम्हाला अचूक उत्तर माहीत आहे व ते तुम्ही उत्तरपत्रिकेत काळे करता. पण सर्व प्रश्नांच्या बाबतीत असे होत नाही. अगदी पदप्राप्ती करणाऱ्या उमेदवारांनाही सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक माहीत नसतात. तेव्हा दुसरी पद्धती वापरावी लागते. ती म्हणजे गाळणी पद्धती (Elimination) जर पर्यायांपैकी कोणते पर्याय उत्तर ठरू शकत नाही हे ठरवता आले तरी योग्य उत्तरापर्यंत पोहचता येते. या दोन्हींचा वापर करायला हवा.

वेळेच व्यवस्थापन

पूर्वपरीक्षेत वेळेच योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. काही उमेदवार हे भान विसरतात व काही प्रश्न अचूक सोडवायच्या नादात त्यांना सर्व प्रश्न वाचताच येत नाही. समजा त्यांनी शंभरापैकी ऐंशीच प्रश्न सोडवले व त्यात अचूकता ठेवली तरी ही पद्धत योग्य नाही. मुळात स्पर्धा परीक्षेचे स्वरूपच असे असते की जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्याशिवाय कट ऑफ पार करता येत नाही. हे ऐंशी प्रश्न सोडवणारे उमेदवार जेव्हा परीक्षा हॉलच्या बाहेर येऊन उरलेले वीस प्रश्न बघतात तेव्हा डोक्याला हात लावतात कारण बऱ्याचदा ते प्रश्न एकदम सोपे असतात.

वेळ संपायच्या पाच ते दहा मिनिटे आधी तरी पेपर संपला पाहिजे. म्हणजे मग आपला रोल नंबर, सीरीज, व इतर तपशील योग्य भरलेले आहेत की नाही हे पुन्हा तपासता येते. परीक्षकांनी दिलेल्या सूचना काटेकोर पाळल्या आहेत की नाहीत हेही बघावे लागते, त्यात हलगर्जी चालत नाही.

पहिला पेपर झाल्यावर लगेच एक-दीड तासाच्या गॅपनंतर पुढचा पेपर असतो. त्यामुळे पेपर झाल्यावर लगेच काहीतरी हलके खाऊन पुढच्या पेपरच्या नोट्सची उजळणी करावी, आधीचा पेपर कसा गेला याची चर्चा करत राहू नये कारण त्यातून बहुमूल्य वेळ वाया जातो.






- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- पूर्वपरीक्षेची अपूर्वाई