नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 6 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

पूर्वपरीक्षेची २०-२० मॅच.....( लेख क्र . ८)

पूर्वपरीक्षेची २०-२० मॅच
काल आपण पूर्वपरीक्षा देताना घ्यायची काळजी बघत होतो. ही पर्यायी प्रश्नांची परीक्षा असल्याने टिच्चून खेळ करावा लागतो.

प्रश्नांचा चक्रव्यूह

प्रश्न सोडवताना नकारात्मक गुणांचा सामना करून हा चक्रव्यूह कसा भेदायचा ते आज बघू. सामान्य अध्ययनात १०० प्रश्न असतात, त्यांचे हातात पेपर मिळाल्यामिळाल्या अ, ब, क, ड अशा चार गटात ढोबळ मानाने विभाजन करता येईल. 'अ' म्हणजे असे प्रश्न ज्यांची उत्तरे तुम्हाला हमखास माहिती आहेत. ते प्रश्न आधी सोडवायचे व स्कोअर बघायचा, ही तुमची बेसलाइन. ही जितकी वरची असेल तितके तुम्ही सेफ. समजा पहिल्याच फटक्यात ६५ प्रश्न अचूक जमताहेत तर प्रश्नच संपला, पुढे बघूच नका. पेपर देऊन टाका आणि घरी या. पण वास्तवात असे काही होत नाही. 'अ' ४० च्या आसपास अडकतो. मग आता 'ब'कडे वळायचे. असे प्रश्न की ज्यात आपण दोन पैकी एक उत्तर आहे हे माहीत आहे. पण ते कोणते या द्विधा परिस्थितीत आहोत. आता धोका पत्करणे भाग पडते. अशा प्रश्नात धोका ५०:५० असतो. म्हणजे जर आपण शक्यता (Probability) काढली तर दोनपैकी एक बरोबर येऊ शकतो. चुकलेल्या प्रश्नाला नकारात्मक १/३ आहेत. म्हणजेच धोका घ्यायला काही हरकत नाही.

या 'ब' प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एकदा एक उत्तर बरोबर वाटते तर दुसऱ्यांदा दुसरे. त्यामुळे गोंधळ उडतो, जितके जास्त विचार तितका गोंधळ वाढत जातो. अशावेळी एक 'अंदरकी बात'म्हणजे प्रश्न बघितल्यावर तुम्हाला जे उत्तर वाटले ते लगेच नोंदवून ठेवले पाहिजे व बऱ्याचदा तेच उत्तर असते. कारण शेवटी 'आतला आवाज' नावाची काही गोष्ट असते. आता पुन्हा स्कोअर बघायचा. समजा तुम्ही 'अ' मधूनच ४० प्रश्न सोडवले आहेत आणि ५५ ला कटऑफ लागेल असा तुमचा अंदाज आहे. म्हणजे तुम्हाला अजुन १५ प्रश्न बरोबर सोडवले पाहिजेत. याचाच अर्थ 'ब' या प्रकारचे ३० प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार. कारण बरोबर येण्याची शक्यता ५०:५० आहे. हे 'ब' प्रकारचे प्रश्नच यश अपयशामध्ये निर्णायक भूमिका निभावतात. ते सोडवताना आपले एकूण विषयाचे आकलन, अनुभव व अंदाज बांधण्याची शक्ती पणाला लागते.

लेट्स प्ले ऑन

'ब' प्रकारचे प्रश्नही सोडवून झाल्यावर जर स्कोअर पुरेसा येत नसेल तर मग आता 'क' व 'ड' कडे भाग आहे. एरवी जर 'ब' नेच काम झाले तर पेपर देऊन बाहेर पडायचे.

'क' प्रकारचे प्रश्न असे म्हणूयात की यात चार पर्यायांपैकी एक पर्याय असू शकत नाही, हे तुम्हाला नक्की माहिती आहे. पण इतर तीन पर्यायांत उत्तर कोणते आहे हे तुम्हाला माहीत नाही. इथे आता उत्तर बरोबर येण्याची शक्यता (Probability) आणखी मंदावते. १/३ फक्त असते. म्हणजे तीन मधील एक बरोबर येणार दोन चुकणार. नकारात्मक गुणाचा नियम तीन चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे गुण कापले जाणार असा आहे. असे असेल तर धोका पत्करायला हरकत नाही असा अर्थ होतो. म्हणजे तीन प्रश्न बरोबर हवे असतील तर नऊ प्रश्न सोडवणे भाग आहे. शक्यतो 'क' पर्यंत येण्याची वेळ न येवो.

'ड' तर असे प्रश्न आहेत की जे बघून आपल्याला आपण दुसऱ्याच कोणत्या तरी परिक्षेच्या हॉलमध्ये येऊन बसलो आहोत असे वाटेल. त्यांच्याकडे बघून काहीच क्लिक होत नाही. अशा बॉलवर जर खेळायला गेलात तर आऊट व्हायची शक्यता खूप असते. प्रत्येक परीक्षेत अशा प्रकारचे काही प्रश्न (१०० पैकी १५ तरी) असतातच असतात. अशा प्रश्नांना हात लावायचा नाही. अशा बाऊन्सरना आदर दाखवून सोडून द्यायचे. पण जर स्कोअर फारच कमी येत असेल तर मात्र निकराची लढाई करत त्यांचाही सामना करायचाच.

सारांश

आता कोणी म्हणेल की पूर्वपरीक्षेसारख्या दोन तासांच्या परीक्षेत एवढे वर्गीकरण करणे त्यानुसार मोजमाप करून प्रश्न सोडवणे शक्य आहे का? तेवढा वेळ तरी असतो का? उत्तर असे आहे की, हे सवयीने जमते. हे सर्व केले नाही तर जुगार खेळणे व पूर्व परीक्षेतील प्रश्न सोडवत जाणे यात फारसा फरक उरणार नाही. त्यामुळे जर आपण पुरेशा सराव चाचण्या दिल्या असतील, व त्यावेळी हे तंत्र घोटवले असेल तर प्रत्यक्ष परीक्षेत ते तितकेसे कठीण जात नाही.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- पूर्वपरीक्षेची तयारी.

No comments:

Post a Comment