नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Thursday 6 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

स्पर्धेची चौकट .....( लेख क्र . ७ )

स्पर्धेची चौकट
'स्पर्धेची चौकट' असे शीर्षक असले तरी प्रत्यक्षात स्पर्धापरीक्षांमध्ये तीन कोनांचा त्रिकोण असतो. तो म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत. आपण यूपीएससीची परीक्षा उदाहरण म्हणून घेऊ.

सर्वप्रथम पूर्वपरीक्षा असते. एकेकाळी तिच्याऐवजी थेट मुख्य परीक्षा असे. पण परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या वाढू लागली व इतक्या सर्वांची परीक्षा घेणे अवघड जाऊ लागले. तेव्हा चाळणी लावून जे उमेदवार खरोखरच गंभीर आहेत त्यांची मुख्य परीक्षा घेणे योग्य असे वाटू लागले. ती चाळणी म्हणजे पूर्वपरीक्षा. ही फक्त चाळणी असल्याने ‌तिचे गुण मुख्य परीक्षेत धरत नाहीत. ही परीक्षा एका दिवसात संपते व ती पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाची असते. प्रत्येक प्रश्नाला उत्तरांचे चार पर्याय असतात.

यूपीएससीची पूर्वपरीक्षा - नागरी सेवा व भारतीय वन सेवा यांच्यासाठी ही परीक्षा समान असते. पूर्वपरीक्षेत मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संक्षिप्त स्वरूपात असतो. उदा. भारताचा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी. या सर्वांना आपण सामान्य अध्ययन असे म्हणू. या सामान्य अध्यनाबरोबच सीसॅट नावाचा एक पेपर असतो. त्यात एम.बी.ए. सीईटी किंवा कॅट परीक्षांमध्ये असतात तसे प्रश्न असतात. जसे अंकगणित, उताऱ्यावरचे प्रश्न, माहितीचे विश्लेषण, निर्णय प्रक्रियेतील पर्याय इत्यादी. यूपीएससी परीक्षेत फक्त सामान्य अध्ययनाचे गुण निकालासाठी ग्राह्य धरतात व सीसॅटचे किमान गुण मिळवले तरी चालतात. (३३ टक्के) म्हणजेच सीसॅट पास व्हायचे असते. पण, सीसॅटचा पेपर पहिल्यांदा तपासतात व त्यात आवश्यक तेवढे गुण मिळाले तरच सामान्य अध्ययनचा पेपर तपासला जातो.

एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत अजून तरी सीसॅटचा पेपर फक्त किमान गुणांसाठी आहे. कारण, एमपीएससी आपल्या परीक्षांची चौकट यूपीएससीच्या धर्तीवर ठेवायचा प्रयत्न करते. ज्यामुळे उमेदवारांना एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणे सोपे जाते. राज्य सरकारलाही प्रशासक निवडताना पुरेशी निवडसंधी मिळते. उत्तर प्रदेश, बिहारमधील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संघ लोकसेवा आयोगाशी तंतोतंत जुळणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांचे उमेदवार दोन्हीकडे बसतात (संघ परीक्षा व राज्य परीक्षा) आणि कुठले ना कुठले पद मिळवतात.

अशा प्रकारे पूर्वपरीक्षेत दोन पेपर असतात. सामान्य अध्ययनयाला १०० प्रश्न असतात तर सीसॅटमध्ये ८०. दोन्ही प्रत्येकी २०० गुणांचे असतात. त्यापैकी सीसॅटमध्ये ६६ गुण मिळाले की काम झाले. खरी स्पर्धा ही सामान्य अध्ययनात होते. तिथे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात. २००पैकी साधारणत: १२० गुण तरी मिळणे आवश्यक असते.

स्पर्धापरीक्षांच्या पूर्वपरीक्षेत नकारात्मक गुण नावाचा एक प्रकार असतो. एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर १/३ गुण कापले जातात. उदा. एखाद्याने ८० प्रश्न सोडवले. त्यातील २० प्रश्न बरोबर आले व ६० प्रश्न चुकले तर गुण ०. कारण, हे चुकलेले ६० प्रश्न २० बरोबर प्रश्नांची पुण्याई खाऊन जातात. पूर्वी काही टाइमपास म्हणून परीक्षा देणारे उमेदवार रामभरोसे सर्व उत्तरपत्रिका काळी करून ठेवत आणि कधीकधी त्या पद्धतीने त्यांचा अंदाज अचूक बसून तेही पास होऊन जात. त्यामुळे अभ्यासू मुलांवर अन्याय होत असे. त्याशिवाय आयोगाला निवडीसाठी चांगल्या उमेदवारांचा कमी चॉईस मिळत असे. म्हणून नकारात्मक गुण आणले गेले. त्यामुळे आता 'ठोकून देता ऐसा की जे' अशा प्रकारचा दबंगपणा महागात पडतो. कमीत कमी प्रश्न चुकवून, जास्तीत जास्त प्रश्न बरोबर सोडवायची तारेवरची कसरत करावी लागते.





- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- पूर्वपरीक्षेची २०-२० मॅच

No comments:

Post a Comment