नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Friday 31 July 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

स्पर्धापरीक्षांचे प्रांगण ! ( लेख क्र . ४ )

 

स्पर्धापरीक्षांचे प्रांगण!

मुळात या परीक्षांचा हेतू प्रशासकीय कार्यासाठी चांगल्या लोकांची निवड करणे हा आहे. गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नव्हे, ती जनतेत विखुरली असते. स्पर्धापरीक्षांद्वारे सामान्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. अगदी प्राचीन मौर्य साम्राज्यात अशा प्रकारे परीक्षा घेऊन अधिकारी निवडत. चीनमध्ये तर शतकानुशतके अशी परीक्षा देऊन सामान्यांनी असामान्य कामगिरी केली. चीनमधील अशा प्रशासकांना 'मॅडरीन' असे म्हणतात. आपल्याकडे आपण 'नोकरशाही' (Bureaucracy) असे म्हणतो.

या परीक्षांमुळे गुणवत्तेला वाव मिळतो व सरकारलाही चांगले कर्मचारी मिळतात. चांगल्या प्रशासकांचे महत्त्व सरकारच्या बाबतीत अधिक आहे कारण, सरकारी कामकाज गुंतागुंतीचे असते. भारतासारख्या देशात जिथे गरिबी ठाण मांडून बसली आहे, तिथे प्रशासनाचे योग्य निर्णय वरदान ठरतात तर चुकीचे शाप. खासगी क्षेत्रातील व्यवस्थापकांनी चुकीचे निर्णय घेतले तर कंपनीचे फक्त आर्थिक नुकसान होते, सरकारी नोकरशाहीच्या चुकांच्या फटका संपूर्ण देशाला बसतो. अशा प्रकारे भारताचे भवितव्य घडवण्याची ऐतिहासिक संधी या परीक्षेतून मिळते.

'रंग दे बसंती' सिनेमामध्ये मोठा उद्बोधक प्रसंग आहे. तरुणांचा एक गट भ्रष्ट मंत्र्याला मारून रेडिओवरून लोकांसमोर आपले म्हणणे मांडतो. एक श्रोता तिरकसपणे प्रश्न विचारतो 'आपकी लिस्ट पर कौन कौन है?' तेव्हा तो तरुण उत्तर देतो की, 'हमारी ऐसी कोई लिस्ट नही है!' मग आता पुढे काय काय करणार, यावर तो उत्तर देतो, 'आता आम्ही प्रशासनात जाऊ. आय.ए.एस., आय.पी.एस. बनू व देशाच्या उद्धारासाठी प्रयत्न करू. ब्रिटिश काळात देशांसाठी प्राण देणाऱ्यांची गरज होती. आज जगणाऱ्यांची गरज आहे.'

भारतासारख्या खंडप्राय देशाच्या प्रशासनासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरशाहीची गरज भासते. भारतासारख्या विकसनशील देशात नोकरशाहीने स्थिती 'जैसे थे' न ठेवता विकास घडवून आणणे आवश्यक असते. थोडक्यात भारतातील प्रशासनाने विकासाचे साधन म्हणून काम करणे अपेक्षित असते.

ब्रिटिश काळात नोकरशाही ब्रिटिशांची एजंट होती. ती विकासाच्या योजनांना, लोकसहभागाला हाणून पाडे. अशा नकारात्मक भूमिकेमुळेच सुभाषचंद्र बोस यांनी आय.सी.एस.चा राजीनामा दिला तर अरविंद घोष रूजूच झाले नाहीत. अशी ही बदनाम सेवा बंद करायची काहीची मागणी होती. पण, सरदार पटेल मध्ये पडले. ते म्हणाले, या सेवा नसतील तर हा अवाढव्य देश चालवणार कोण? आपण त्यांचा दृष्टीकोन व कार्यशैली सुधारून घेऊन पण, त्यांना बरोबर घेऊनच जाऊ. पटेलांचा हा आग्रह मान्य झाला व जुन्या आय.सी.एस.चे रूपांतर आय.ए.एस.मध्ये झाले. आय.सी.एस.चे जनक लॉर्ड कॉर्नवालीस यांना मानले जात असले तरी नव्या रूपातल्या आय.ए.एस.चे जनकत्व सरदार पटेलांकडे जाते.

पटेलांनी नोकरशहांची स्वातंत्र्यानंतर बैठक घेतली. पटेल त्यांच्यासमोर मोजकेच बोलले. पटेल म्हणाले, 'ज्या गोष्टीने मला आजवर अपरंपार आनंद दिला ती गोष्ट मी आज तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. ती म्हणजे देशसेवा. ही भेट दोन्ही हातांनी भरभरून घ्या. ती कशी घ्यायची हे आपण लवकर बघू. ही एक विशिष्ट संधी आहे. ती चुकवता कामा नये.



- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                       ...........पुढच्या भागातःस्पर्धापरीक्षांच्या आराखड्या विषयी

No comments:

Post a Comment