नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Friday 31 July 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

समज-गैरसमजांचा व्हायरस ( लेख क्र . १)

समज-गैरसमजांचा व्हायरसस्पर्धापरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण काल केला. हे प्रश्नोपनिषद आपण आज चालू ठेवू. स्पर्धापरीक्षा देऊ बघणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या पालकांना अनेक समज-गैरसमजांचा सामना करावा लागतो. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या क्षेत्रातील करिअरविषयी अनेक चुकीच्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतात. अशाच काही चुकीच्या कल्पनांमुळे अनेकजण स्पर्धापरीक्षांच्या वाटेलाच येत नाहीत. 'हा नाद खुळा!' असे त्यांना वाटते. हा व्हायरस डिलिट करण्याचा अॅण्टी-व्हायरस आपण टाकूया...

खूप वर्षे अभ्यास करावा लागतो

- आपल्याकडे स्पर्धापरीक्षांचे वातावरण आता कुठे तयार होते आहे. जे उत्तरेत व दक्षिणेत पूर्वीच तयार झाले आहे. त्यामुळे अनेकांना या परीक्षांबद्दल उशिरा माहिती मिळते. त्यामुळे त्यांची सुरुवातही उशिरा होते. आपला एक उमेदवार रोहिदास दोरकुळकर याला एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहितीच वयाच्या तिसाव्या वर्षी मिळाली. तरीही त्यानंतर त्याने जिद्दीने अभ्यास करून मुख्याधिकारी हे पद मिळवले व तो त्या पदावर काम करतो आहे.

त्यामुळे पद मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामागे हे एक कारण असते. इतरही कारणे असतात. काहींनी उमेदवारांच्या मनात असे भरवून दिले असते की परीक्षा उत्तीर्ण व्हायला अनेक वर्षे लागतात. मग काहींचा पंचवार्षिक योजना पद्धतीने कारभार चालतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे खरे असले तरी अशा पायऱ्या बनवत जायचे नाही.

शाळा-कॉलेजमध्ये अभ्यास ठरलेल्या स्वरूपाचा असतो, तर स्पर्धापरीक्षांमध्ये अभ्यास हा गतिमान असतो. एकच एक पुस्तक वाचून सगळा अभ्यास होत नाही. पण, याची दुसरी बाजू अशी की काही विद्यार्थी पसरटपणे काहीही वाचत बसतात. त्यांना कोणीतरी सांगितले असते की, 'स्पर्धापरीक्षेत सूर्याच्या अधिपत्याखाली असलेले सर्वकाही विचारतात'. माझी एक स्टुडंट मुलगी सुरुवातीला जवाहरलाल नेहरूंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचत बसली होती. कारण कोणीतरी तिला सांगितले की तिथून सुरुवात कर.

प्रत्यक्षात स्पर्धापरीक्षांचा अभ्यासक्रम हा पुरेसा स्पष्ट करून दिला आहे व त्या त्या विषयानुसार वाचण्यासाठी संदर्भग्रंथही उपलब्ध आहेत. मग असे असताना फोकस नसताना केलेला अभ्यास आणि नेम न धरता केलेला गोळीबार यांचा काहीच उपयोग होत नाही.

काहीजण (व जणी) आपण या मोठ्या परीक्षा देत आहोत या कल्पनेच्या प्रेमात पडलेले असतात. जसे काही परीक्षा देणे हेच करिअर. खरेतर परीक्षा फक्त साधन असून, अधिकारी बनून देशसेवा करणे हे साध्य आहे. साधनांचे साध्यात रूपांतर करून काहीच साध्य होत नाही.

काहीजण कोणतेही मार्गदर्शन न घेता 'एकला चलो रे' म्हणत एकटेच भटकत निघतात. ते बऱ्याचदा भरकटतात हे वेगळे सांगायला नको. आयुष्यात एखादी छोटी गोष्ट साध्य करण्यासाठीही अनेकांची मदत लागते; तर मग एवढी मोठी झेप कुणाच्या मदतीशिवाय कशी शक्य होईल? थोडक्यात मार्गदर्शन, अभ्यासगट, अभ्यास साहित्य या सर्वांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे.

अभ्यास (search) आणि संशोधन (research) यांच्यातील सीमारेषाही ओळखता आली पाहिजे. स्पर्धापरीक्षांमध्ये आधीच उपलब्ध माहितीचा अभ्यास करून त्याचा सारांश आत्मसात करायचा असतो, नवीन शोध लावायचा नसतो. मुळात एका वर्षाच्या मर्यादित कालावधीत ते शक्यही नसते. ही लक्ष्मणरेषा एकदा आखता आली आणि काटेकोरपणे पाळता आली तर यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे थांबण्याची गरज नाही.

सरकारी नोकरांचीच मुले पास होतात


- ज्यांच्या घरी कोणी ना कोणी सरकारी नोकरीत आहे त्यांना या परीक्षेची माहिती लवकर मिळते. त्यांनी या नोकरीतले आव्हान ओळखले असल्याने ते प्रेरित झालेले असतात. त्यामुळे सरकारी नोकरांची मुलेच जास्त प्रमाणात पदप्राप्ती करतात असे काहींना वाटते. पण, खरोखरच असं काही नाही. घरातून अशी कोणतीही पार्श्वभूमी नसणारे अनेकजण नेमाने पद पटकवतात, तर अशी ही उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर आहेत की आय.ए.एस/आय.पी.एस. अधिकाऱ्यांची मुले खूप प्रयत्न करूनही पद प्राप्त करू शकली नाहीत.


- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                       ...........पुढच्या भागात :- लॉग-इन : स्पर्धा परीक्षांचे

No comments:

Post a Comment