नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Tuesday, 3 November 2015

Current Affairs MCQ – 2 November 2015

Image result for BrahMos supersonic cruise missile1) BrahMos supersonic cruise missile was
 recently test fired from on board of 
recently inducted guided missile destroyer named?
(A) INS Alleppey
(B) INS Kochi
(C) INS Kavarathi
(D) INS Kalki

Thursday, 13 August 2015

39) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

सीसॅटचे विश्लेषण...(लेख क्र . ३९)

सीसॅटचे विश्लेषण
 
येत्या यूपीएससीची पूर्वपरीक्षेत सीसॅट भाग - २ ची सरंचना कशी आहे ते खालील लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

'संघ लोक सेवा आयोगाने' सन २०११ला नागरी सेवा पूर्वपरीक्षेत 'सामान्य अध्ययन - २' म्हणजेच 'सीसॅट' हा पेपर समाविष्ट केला. त्यानंतर सन २०१३मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याही 'राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये' सीसॅटचा पॅटर्न अंतर्भूत करण्यात आला. वरील दोनही पूर्वपरीक्षांमध्ये हा पेपर एकूण २०० मार्कांचा असून, यात ८० प्रश्न विचारले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला २.५ मार्क असतात. 'सीसॅट' हा पेपर एकूण ७ विभागांमध्ये विभागलेला आहे.

> आकलन (Comprehension)

> संभाषण कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्ये (Interpersonal Skills including communication skills)

> तर्कशास्त्रीय युक्तिवाद व पृथक्करण क्षमता (Logical Reasoning and analytical Ability)

> निर्णयक्षमता आणि समस्या निराकरण (Decision making and problem solving)

> सामान्य मानसिक क्षमता (General mental ability)

> मुलभूत गणित आणि आलेखाचे पृथक्करण (Basic Numeracy and Data Interpretation)

> मराठी (केवळ राज्यसेवेसाठी) आणि इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये. (Marathi MPSC only) and English comprehension skills)


या पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे एक तृतियांश म्हणजेच (०.८३) मार्क वगळण्यात येतात. परंतु, निर्णयक्षमता आणि समस्या निराकरणांवरील चुकीच्या उत्तरांसाठी मार्क वजा करण्यात येत नाहीत.

२०१५च्या नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी सीसॅट हा पेपर पात्रताफेरी गाठण्यासाठी मर्यादीत करण्यात आला आहे. म्हणजेच या पेपरमध्ये आता विद्यार्थ्यांना किमान ३३ टक्के म्हणजेच ६६ मार्क मिळवावे लागणार आहेत. परंतु, मार्कवत्ता यादी ठरविताना 'सीसॅट' पेपरमध्ये मिळालेले मार्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. तसेच 'इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये' विभाग क्रमांक - ७ वरील प्रश्नसुद्धा वगळण्यात आले आहेत. नागरीसेवा पूर्वपरीक्षेत सीसॅटचा पेपर हा 'मध्यम' काठीण्यपातळीचा असतो. त्यामुळे पात्रता मार्क मिळवण्यासाठी विद्यार्थांनी विशिष्ट मर्यादेपर्यंत सराव करावा. दररोज किमान एक ते दीड तास 'सीसॅट'च्या प्रश्नांचा सराव केल्यास आणि दर आठवड्याला किमान सराव पेपर सोडवल्यास पात्रता गाठणे फारसे कठीण जाणार नाही.

राज्यसेवा परीक्षेच्या 'सीसॅट' पेपरमध्ये मिळवलेले मार्क हे मार्कवत्ता यादी ठरवण्यासाठी ग्राह्य धरले जातात. त्यामुळे या पेपरला राज्यसेवा पूर्वपरीक्षेची 'सामान्य अध्ययन - १' इतकेच महत्त्व आहे. राज्यसेवा परीक्षेमधील सीसॅटची काठीण्यपातळी ही नागरीसेवा परीक्षेमधीलच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीसॅटवर अधिक भर देणे आवश्यक आहे. राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी दररोज दोन तास सीसॅटच्या सराव आणि दर आठवड्याला एक पेपर सोडवल्यास सीसॅटच्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळू शकतील.

सीसॅटची तयारी सुरू करण्याआधी विद्यार्थ्यांनी गतवर्षींच्या प्रश्नपत्रिकांचे विभागनिहाय विश्लेषण करणे आवश्यक आहे. नागरीसेवा पूर्वपरीक्षेच्या 'सीसॅट' पेपरमध्ये 'आकलन' आणि 'इंग्रजी भाषेतील आकलन कौशल्ये' यावर ८० पैकी जवळपास ३० ते ४० (४०% ते ५०%) प्रश्न विचारले जातात. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तर ८०पैकी जवळपास ५० (६२.५%) प्रश्न हे आकलन व मराठी आणि इंग्रजी आकलन कौशल्ये या विभागाशी निगडीत असतात.

सन २०११ ते २०१५मधील नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि सन २०१३ ते २०१५मधील राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांच्यातील सामान्यअध्ययन म्हणजेच सीसॅट या पेपरचे विभागनिहाय विश्लेषण हे खाली दिलेले आहे. कंसातील आकडे हे राज्यसेवेचे आहेत.

शास्त्रीय संगीतामध्ये रियाज केला जातो. तसा सीसॅट हा रियाजचा पेपर आहे. न चुकता न कंटाळता रोज थोडा वेळ अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे केवळ वाचन नाही. हा विषय स्वतः पेन घेऊन सोडवून पाहिल्याशिवाय आत्मसात होत नाही. सुरुवात सोप्या प्रश्नांपासून करून हळूहळू काठीण्यपातळी वाढवत न्यायची. महत्त्वाची सूत्रे, तोडगे, युक्त्या एका वेगळ्या कागदावर काढून ठेवायच्या. सराव करताना हा कागद जवळ बाळगायचा (परीक्षेला बरोबर घेऊन जाऊ नका)


 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                      

38) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

प्रश्नांची दिशानिश्चिती...(लेख क्र . ३८)

प्रश्नांची दिशानिश्चिती
मुख्य परीक्षेतील प्रश्न हे नुसतेच गुंतागुंतीचे नसतात, तर त्यांना विशिष्ट दिशा दिलेली असते. ती दिशा ओळखून त्या दिशेने उत्तर यावे लागते. ही दिशा प्रश्नाच्या शेपटीत दडलेली असते. एकाच विधानावर शेपूट वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. उदा. चर्चा करा व विवेचन करा. या दोन्ही गोष्टी एकच वाटल्या तरी त्या तशा नाहीत. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे आणि त्यामुळे उत्तराचे प्रसरण वेगवेगळे झाले पाहिजे. प्रश्नातून माहिती विचारली आहे की, विश्लेषण हेही जाणून घेतले पाहिजे.


वर्णन करा (Describe) - प्रश्नातील विधान मान्य करून ते उलगडत नेणे इतकेच अपेक्षित असते.

स्पष्ट करा (Explain) - येथे संकल्पनात्मक विवेचनाची जास्त अपेक्षा आहे. तथ्यांचा वापर कमी असायला हवा.

विश्लेषण करा (Analyse) - प्रश्नाला अनेक अंगांनी भिडून त्याच्या विविध पैलूंची एकमेकांशी व संदर्भाशी तुलना घडवून आणणे अपेक्षित आहे.

पाहणी करा (Assess) - एखादा निरीक्षक ज्याप्रमाणे गोदामाची पाहणी करून महत्त्वाच्या बाबी नोंदवेल जसे किती माल आहे, कोणत्या स्थितीत आहे, त्याप्रमाणे तटस्थप्रमाणे पाहणी करायची.

मूल्यमापन करा (Evaluate) - प्रत्येक कृतीमागे काही एक मूल्यव्यवस्था असते. त्या मूल्याच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने कृती घडते. प्रत्यक्षात त्या मूल्यांमध्ये व कृतीमध्ये 'दरी' निर्माण होते. या दरीची खोली, लांबी, रूंदी मोजून मांडणे म्हणजे मूल्यमापन.

टीकात्मक मूल्यमापन (Critically evaluate) - मूल्यमापनाचेच हे पुढचे पाऊल आहे. ही विचार व कृती यात दरी का पडली याची कारणमीमांसा करणे यात अपेक्षित आहे.

परीक्षण करा (Examine)
- एखादी व्यक्ती/घटना/चळवळ त्यांचे हेतू साध्य करण्यात यशस्वी झाली का? झाल्यास कोणत्या कारणांनी व न झाल्यास कुठल्या कारणांनी हे मांडणे अपेक्षित आहे.

वैशिष्ट्ये सांगा (Give Characteristics) - प्रश्नातील संदर्भाच्या मुख्य पैलूचा उलगडा करणे यात अपेक्षित आहे.

चर्चा करा (Discus) - प्रश्नात दिलेल्या संदर्भाच्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडायच्या व सोडून द्यायचे. निष्कर्ष द्यायची गरज नाही. तुलनात्मक विश्लेषणाचीही गरज नाही.

स्पष्टीकरण द्या (Elaborate)
- प्रश्नातील विधानाशी सहमत होत ज्या विधानाचे मागचे व पुढचे दुवे जोडून दाखवणे.

महत्त्वाचे पैलू (Salient Features) - प्रश्नातील विधानाचे पैलू क्रमवार मांडणे.

दाखवून द्या (bring out)
- प्रश्नातील विधानाचे महत्त्वपूर्ण पैलू जोरकसपणे मांडणे

प्रकाश टाका (highlight) - नावाप्रमाणे प्रश्नात दिलेल्या भागावर प्रकाश टाकून तो भाग उजळून टाका.

चित्र रेखाटा (sketch) - चित्रकार जसा मोजक्या रेषांमध्ये एखादी गोष्ट जिवंत करतो त्याप्रमाणे वाक्याच्या रेषांनी सत्य प्रतिबिंबित करणे अपेक्षित आहे.

मागोवा घ्या (trace) - एखाद्या गोष्टीचा कालक्रमाने होणारा विकास दाखवत जाणे व तो सध्याच्या वास्तवाला आणून भिडवणे.

विशेष दाखवा (significance) - विषयाचे महत्त्व तुलनात्मक पद्धतीने दाखवून देणे.

उदाहरणासह लिहा (elucidate)
- म्हटल्याप्रमाणे उदाहरणे पुरावे म्हणून देऊन स्पष्टीकरण देणे.

समीक्षा करा (critise) - इथे काहींना असे वाटते की, नकारात्मक अर्थच दाखवून द्यायचा आहे. पण तसा अर्थ नाही. समीक्षा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे रहस्य उलगडून दाखवणे, मर्मावर बोट ठेवणे.

तुलना करा (Compair) - प्रश्नात दिलेल्या दोन बाबींची मुद्देसूद तुलना करणे अपेक्षित आहे. सगळेच मुद्दे यायला हवे असे नाही, पण महत्त्वाचे मुद्दे क्रमवार यायला हवे.

व्याख्या करा (define) - एखाद्या घटनेतील गुंतागुंत सोडवून तिचे स्पष्ट व शास्त्रीय विवेचन म्हणजे व्याख्या करणे.

आढावा घ्या (account for) - जमाखर्चाचा एखादा अहवाल मांडावा त्याप्रमाणे तथ्ये व त्यांची कारणमीमांसा यांचा उलगडा अपेक्षित आहे.

तुम्हाला मान्य आहे का? (do you agree) इथे 'तुम्हाला' असे म्हटले असले, तरी ते खरोखर व्यक्तिगत तुम्हाला नसून, तुमच्यासारख्या प्रश्नाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून आलेल्याला मान्य आहे का असे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या विषयावर जे प्रमाणित मत आहे ते मांडणे कधीही चांगले. या प्रश्नामध्ये प्रश्नातील विधानाच्या विरुद्ध जायची मुभा आहे.

मत मांडा (comment) - या प्रकारचे प्रश्न आता परीक्षेत वाढले आहेत. यातून आयोग कुंपणावर बसू न देता बाजू घेणे भाग पाडतो. अशावेळी बाजू घ्यायची व ती लढवायची. अगदी प्रश्नातील विधानाच्या विरुद्ध जावे लागले तरी बेहत्तर. आयोग लढाऊ वृत्तीला गुण देतो त्यामुळे आपण मांडलेली बाजू बरोबर की, चूक याचे टेंशन घ्यायची गरज नाही. अशा प्रशनांमध्ये बहुतेक वेळा अशी कोणतीही निर्णायक बरोबर बाजू नसतेच.

आपण एवढी क्रियापदे पाहिली. पण, हल्ली परीक्षेत कधीकधी काहीच दिशा देत नाहीत. नुसतेच विधान असते. ते कोणाचे, कोणत्या संदर्भात व त्याचे काय करायचे याबद्दल काहीच दिलेले नसते. अशावेळी खरी कसोटी लागते. स्वतःच वरीलपैकी कोणती दिशा त्या विधानाला देणे योग्य ठरेल हे ठरवून त्याप्रमाणे उत्तर लिहावे लागते. प्रश्नातील विधान सर्वमान्य असेल, तर स्पष्ट करा, विवेचन करा अशा प्रकारे दिशा देता येईल. पण, प्रश्नातील विधान खोडसाळ वाटले तर मत मांडा, टीकात्मक समीक्षा या पद्धतीने त्या विधानांची चिरफाड करायला काही हरकत नाही.

हे सर्व सरावाने जमते. एकंदरीत ही सर्व चर्चा म्हणजे काठावर बसून पोहण्याची चर्चा करण्यासारखे आहे. पाण्यात पडल्याशिवाय जसे पोहणे शिकता येत नाही, तसे नुसती चर्चा करून हे सर्व बारकावे आत्मसात होणार नाहीत. त्यासाठी लिहूनच बघितले पाहिजे.

 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- सीसॅटचे विश्लेषण

37) स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला...

उत्तरायण...(लेख क्र . ३७)

उत्तरायण

प्रश्न व उत्तरे यातील जैवसंबंधाची आपण चर्चा केली. हा संबंध जितक्या अलगदपणे उलगडेल तितकी यशाची शक्यता वाढते. उत्तरांच्या मांडणीतील या काही टिप्स.

डाव आणि पेच

परीक्षेतील प्रश्न एकेकाळी सरळ व साधे असत. तो काळ गेला. आता प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ओळीच्यामध्ये वाचून डोकवावे लागते. (Reading between the lines) शब्दांपलीकडचा अर्थ ध्यानात घ्यावा लागतो. मुळात प्रश्न काय आहे, हे कधीकधी लगेच समजत नाही. एखादे विधान दिले जाते. ते कोणी केले, कोणत्या संदर्भात केले हेही सांगितले जात नाही. त्यामुळे त्या विधानाचा संदर्भ ओळखणे ही सर्वात निर्णायक बाब ठरते. त्या खालोखाल जर जमले तर ते विधान कोणी केले हे ओळखता येणे. पण पूर्ण खात्री असेल तरच विधान कोणाचे आहे, ते उत्तरात लिहावे, एरवी त्याची खास गरज नाही. पण विधानाचा अचूक संदर्भ ओळखणे महत्त्वाचे आहे. निव्वळ संदर्भ न लागल्याने प्रश्न सोडून देणारे उमेदवार आहेत. त्याहून वाईट म्हणजे संदर्भ चुकीचा लागला, तर लेखणी झिजवून, वेळ देऊन आपण उत्तर लिहितो, ते सगळेच वाया जाते. कधीकधी प्रश्नातील एखाद्या शब्दातून आपल्याला हिंट मिळते. त्यासाठी नेहमीच इंग्रजी व हिंदी अशा दोन्ही भाषांत प्रश्न बघायचा. कधीकधी त्यातून संदर्भाचा उलगडा होतो.

आंधळी कोशिंबीर

असे फिरवून प्रश्न विचारण्यात एक फायदा आहे, की त्यामुळे परीक्षार्थी सखोल अभ्यास करून आले आहेत की, वरवरचा अभ्यास केला आहे, हे समजते. ज्यांचा अभ्यास तकलादू आहे, त्यांना प्रश्नांचाच थांग लागत नाही. ते उत्तरात आंधळी कोशिंबीर खेळतात. पण ते सहज पकडले जातात. कारण लेखी उत्तरांमध्ये दुसऱ्या-तिसऱ्या ओळीमध्येच उमेदवाराची चलाखी पकडता येते. लेखी परीक्षेत फसवाफसवी करता येत नाही. त्यामुळे पूर्वपरीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेचा अदमास जास्त चांगल्याप्रकारे बांधता येतो व प्रयत्नांना थेट फळ मिळते.

संयमाची आवश्यकता

काहींना आपले गुण दाखवायची (उधळायची) सवय असते. प्रश्न कोणताही असो, त्यांना हवे ते त्या प्रकारे उत्तर लिहितात. हे उमेदवार 'अपने मन के बादशहा' असतात. त्यांची तक्रार असते, की त्यांचे सगळे ज्ञान परीक्षेत तपासलेच जात नाही. आता तत्त्वतः हे खरेच आहे. परीक्षेतील प्रश्नातून अभ्यासातील फार तर पाच टक्केच ज्ञान तपासले जाते. परीक्षा हा एक प्रकारचा सॅम्पल सर्व्हेच असतो. पण म्हणून हवे तसे लिहून चालणार नाही. शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने परीक्षक उमेदवाराची तयारी जोखतो. परीक्षकाच्या क्षमतांवर शंका घेण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. परीक्षा निकोप आहे व त्यातून आपल्याला आपल्या मेहनत व कुवतीनुसार न्याय मिळेल, अशी श्रद्धा असल्याशिवाय स्पर्धापरीक्षा देऊ नये किंवा परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यामध्ये अशा प्रकारची श्रद्धा ढासळू लागली, तर सरळ स्पर्धापरीक्षांना रामराम ठोकावा. एकदा व्यवस्थेवर अविश्वास निर्माण झाला, तर प्रयत्न बोथट होतात, १००% योगदान देता येत नाही. मग उमेदवार व आयोग दोघांमधील संबंध कटू बनतात. ही कटुता टाळायची असेल, तर आयोगाच्या क्षमतेबद्दल नकारात्मक बोलणे, लिहिणे किंवा विचार करणे टाळावे. कारण या सगळ्याची परिणती अपयशाचे खापर परीक्षापद्धतीवर फोडण्यात होते. अपयश आले तरी ते स्वीकारता आले पाहिजे. कोणावर खापर फोडून उपयोग नाही.

एकाच लांबीची उत्तरे हवी

उत्तरांना जर न्याय दिला नाही, उत्तरांनाही प्रश्न पडू लागतात. उत्तरांना न्याय द्यायचा म्हणजे शक्यतो एकाच लांबीची उत्तरे हवी. खाडाखोड टाळावी. उत्तराची सरंचना तयार न करता थेट उत्तरे लिहायला गेले की ही समस्या होते. उत्तर थोडे अंतर डौलदारपणे जाऊन डेड एंड आल्यामुळे थांबते. मग रस्ता बदलून पुन्हा सुरुवात करावी लागते. यात वेळ तर जातोच, शिवाय परीक्षकावर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळेच संरचना तयार करूनच उत्तरे लिहावी व खाडाखोड करायची वेळ आलीच, तर व्हाइटनरचा वापर करावा. शेवटीशेवटी वेग वाढवावा लागतो. तेव्हाही अक्षर फार बिघडता कामा नये. सरावासाठी मुद्दामहून कमी वेळात काही उत्तरे लिहून बघावी. पेनाचे टोक व बोट यात योग्य अंतर ठेवावे (दीड सेंटीमीटर) लिहून लिहून हात दुखतो, तेव्हा दोन प्रश्नांच्या मधल्या काळात विचार करताना पंजा पसरवून बोटांना थोडी विश्रांती द्यावी.

चांगली उत्तरे लिहिता येणे ही एक प्रकारची आराधनाच आहे. ती जर जमली तर यशाच्या महामार्गावरून सुसाट निघालाच म्हणून समजा.
 




- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

                        ............पुढच्या भागातः- प्रश्नांची दिशानिश्चिती